व्याघ्रवधावरून हलकल्लोळ : वन्यजीवप्रेमींचा आरोपचंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यात गेल्या १५ दिवसात सात जणांचा बळी घेणाऱ्या वाघाचा खातमा केल्याचा दावा वन विभागाकडून होत असताना दुसरीकडे मात्र वन्यजीवपे्रमींनी आक्षेप घेतला आहे. यामुळे हे प्रकरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.मंगळवारी सायंकाळी पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी गावाजवळील जंगलात वनविभागाने शॉर्प शूटरच्या साहाय्याने वाघाला ठार केले होते. वाघ आणि मानवाच्या संघर्षाची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याचे सोडून केवळ राजकीय दबावापोटी वाघ मारले जात आहेत, असा आरोप होत आहे. ठार केलेला वाघ नर होता. प्रत्यक्षात नरभक्षी वाघ नर नसून मादी होती, असाही आरोप स्थानिक जनतेच्या कथनावरून वन्यजीवपे्रमी करीत आहेत.केवळ अडीच वर्षे वयाचा हा वाघ पूर्ण वाढ झालेला नसून बछडा होता. या वयात वाघाचे बछडे अधिवास निश्चित करणे आणि शिकार करण्याचे प्रशिक्षण मातेकडून घेत असतात. हे लक्षात घेतले तर, तो नरभक्षक नव्हता हेच स्पष्ट होते, असा युक्तिवाद वन्यप्रेमींनी केला आहे. परिसरातील सात व्यक्तींचा वाघाकडून बळी जाणे ही घटना दु:खदायकच आहे. जनप्रतिनिधींनी मतदार संघात विकासकामे न केल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून जंगलात जावे लागते. मात्र जनप्रतिनिधी यावर उपाय सुचविण्यापेक्षा थेट वाघाला मारण्यासाठी आग्रही भूमिका घेतात, हे राजकीय लाभासाठी असल्याचा आरोप वन्यजीवप्रेमींनी केला आहे. विधान परिषद सदस्य शोभाताई फडणवीस यांनी गेल्या सोमवारी, ‘वाघाला वन विभागाने मारावे, अन्यथा आम्हीच त्याला ठार करू’ असे आव्हान देत आठवडाभराचा अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर १७ आॅगस्टच्या दुपारी ३.३० वाजता वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाघाला मारण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर १९ तारखेच्या सायंकाळी त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. शोभाताई फडणवीस यांच्या या विधानावर वन्यजीवप्रेमींनी आक्षेप घेतला आहे. जनतेच्या भावना भडकविणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करून राजकीय स्वार्थापोटी वाघांचा बळी घेणाऱ्या नेत्यांचाच बंदोबदस्त करावा, अशी मागणी ग्रीन प्लॅनेट सोसायटीच्या सदस्यांसह जिल्ह्यातील वन्यप्रेमींनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
वाघाचा बळी राजकीय दबावातून
By admin | Updated: August 21, 2014 01:06 IST