ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेत झालेल्या जाहीर कार्यक्रमात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर शिवसेना-भाजपाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार घोषणा युद्ध रंगले होते. यावेळी भाजपाकडून मोदी-मोदी तर, शिवसेनेकडून ‘चोर है-चोर है’ या घोषणा दिल्या होत्या. त्याच मुद्यावरुन आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत.
मोदींच्या नावाने उन्माद करण्याची गरज नसल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. भाडोत्री बाटग्यांच्या भरवशावर लढता येणार नाही. भाजपामधले बाटगेच मोदी-मोदी करतात असे अग्रलेखात म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना टोले मारण्यात आले असून, घोषणा युद्धात शिवसेनेची काही चूक नसल्याचा दावा करण्यात आला आहे. अरेला कारे करण्याचा शिवरायांचा धर्म आम्ही पाळला असे अग्रलेखात लिहीले आहे.
महापालिकेचा आर्थिक कणा असलेला जकात कर १ जुलैपासून बंद होऊन वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आला आहे. त्यामुळे नुकसानभरपाई म्हणून महापालिकेला साडेपाच हजार कोटी रुपये मिळणार आहेत. या भरपाईचा ६४७ कोटींचा पहिला धनादेश देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
आणखी वाचा
घोषणा युद्धानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपा नगरसेवक मकरंद नार्वेकर यांना धक्काबुक्की, मारहाण केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी हा राडा रोखण्याऐवजी मौन बाळगल्याने नगरसेवकांना पायबंद उरला नव्हता.
उद्धव ठाकरे आणि मुनगंटीवार यांचे पालिका सभागृहात आगमन होताच भाजपाच्या नगरसेवकांनी ‘मोदी-मोदी’ घोषणाबाजी सुरू केली. तर त्यांना प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांनी ‘चोर है-चोर है’ घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.
ही घोषणाबाजी हाणामारीवर उतरण्याची शक्यता दिसू लागल्याने अखेर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हस्तक्षेप करत नगरसेवकांना शांत केले. मात्र उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना सभागृहाबाहेर जाणाऱ्या भाजप नगरसेवकाला चोप देऊन शिवसेनेच्या नगरसेवकांनी संताप व्यक्त केला.
घोषणायुद्धात नेते मौन
या कार्यक्रमाला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विद्या ठाकूर, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, भाजपचे खासदार, आमदार उपस्थित होते. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मंत्री रवींद्र वायकर, सुभाष देसाई, दिवाकर रावते, खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते. या नेत्यांसमोरच नगरसेवकांचे घोषणायुद्ध रंगले. मात्र आपापल्या पक्षाच्या नगरसेवकांना शांत करण्याची तसदी या नेत्यांनी घेतली नाही. यावरूनच या वादावादीला त्यांचे मूक समर्थन असल्याचे दिसून आले.