मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेच्या इस्पितळात ५०० डॉक्टरांची मागणी असताना प्रत्यक्षात २६० डॉक्टर्स उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. डॉक्टरांचे मनुष्यबळ पुरेसे नाही हे खरे असले तरी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डॉक्टरांची संख्या व कामाचे वाटप केले गेलेले असल्याने याबाबत रिव्ह्यू पिटीशन करण्यात येईल, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी विधान परिषदेत दिले.राहुल नार्वेकर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना दाखल केली होती. नार्वेकर म्हणाले की, दरवर्षी मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातून १०४६ डॉक्टर्स उत्तीर्ण होतात. मात्र प्रत्यक्षात २५० डॉक्टर्स मुंबईकरांना सेवा देण्याकरिता उपलब्ध होतात. महापालिकेच्या दवाखान्यांत २०११ पासून ‘झीरो फ्लोअर बेड’ ही योजना लागू केलेली आहे.महापालिकेच्या इस्पितळात ५०० बॉन्डेड डॉक्टर्सची गरज असताना निम्मे डॉक्टर्सही उपलब्ध होत नाहीत. राज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले की, नार्वेकर यांनी दिलेली माहिती वास्तववादी आहे. २०११ साली महापालिकेच्या सेवेतील डॉक्टर मुंबई उच्च न्यायालयात गेले. डॉ. पाटील म्हणाले की, महापालिकेच्या अखत्यारितील १७४ दवाखाने, १८३ प्राथमिक आरोग्यकेंद्रे, २८ प्रसूतीगृहे, १८ रुग्णालये, ५ विशेष रुग्णालये आणि ४ प्रमुख रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज ४५ हजार रुग्ण तपासणीकरिता येतात. या रुग्णालयांत दरवर्षी बाह्यरुग्ण विभागात ८० लाख तर आंतररुग्ण विभागात ३ लाख रुग्णांवर उपचार होतात. ७५ हजार प्रसुती व १ लाख ५० हजार शस्त्रक्रिया केल्या जातात. मुंबई व परिसरातून महापालिका इस्पितळात उपचारांसाठी ५२ टक्के तर महाराष्ट्र व इतर राज्यातून ४८ टक्के रुग्ण येतात. विद्या चव्हाण, जयंत पाटील, हेमंत टकले यांनी चर्चेत भाग घेतला. (विशेष प्रतिनिधी)
पालिका इस्पितळात केवळ २६० डॉक्टर्स
By admin | Updated: March 31, 2015 03:57 IST