रूपेश उत्तरवार - यवतमाळ पावसाच्या दडीने शेतकरी हैराण आहे. एकूण लागवड क्षेत्रापैकी केवळ २० टक्के क्षेत्रातच पेरणी झाली. या स्थितीत पिकांना संरक्षणासाठी हवामानावर आधारित पीक विमा योजना जाहीर करण्यात आली. यासाठी अंतिम मुदत ३० जून आहे. मात्र पाऊस झाला नसल्याने पेरण्याही खोळंबल्या. अशा स्थितीत पीक विम्याची मुदत संपली आहे. नाममात्र लोकांनाच या योजनेचा लाभ घेतला.निसर्गाचा लहरीपणा, पावसाचा विलंब यामुळे शेतमालाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी हवामानावर आधारित पीक विमा जाहीर करण्यात आला. राज्यात प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात आली. अमरावती विभागात यवतमाळ आणि अमरावती या दोन जिल्ह्यासाठीच ही योजना लागू करण्यात आली. याशिवाय इतर पाचही विभागात प्रायोगिक तत्वावर असलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ३० जून ही अंतिम मुदत आहे. पेरण्या खोळंबल्याने शेतकऱ्यांना पीक विमा काढता आला नाही. एका महत्वाकांक्षी योजनेला शेतकऱ्यांना मुकावे लागणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत नऊ लाख हेक्टरपैैकी १ लाख २० हजार हेक्टरवर पेरण्या व्हायच्या आहे. पश्चिम विदर्भात ४० लाख हेक्टरवर शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही. पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी अनेक ठिकाणी बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. यातूनच आजपर्यंत पिका विमा काढण्यासाठी शेतकरी पुढे आले नाही. शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र झालेले पेरणी क्षेत्र पटवाऱ्यांना माहीत नाही. यातून पटवारी पेरणीचे प्रमाणपत्र द्यायला तयार नाही. या योजनेचा प्रसारही पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. त्यामुळे शेतकरी पीक विमा काढण्यापासून वंचित राहिल्याचे सांगितले जाते. निसर्गाच्या लहरीपणापासून शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण देण्यात आले. त्यामुुळे शेतकऱ्यांना आशेचा किरण गवसला होता. प्रत्यक्षात पेरणीपूर्वीच मुदत संपल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसणार आहे. यातून असुरक्षिततेची भावना वाढीस लागून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.
पेरणीपूर्वीच संपली पीक विमा योजनेची मुदत
By admin | Updated: June 30, 2014 00:38 IST