मुंबई : हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. राज्यात १ लाख ३६ हजार क्षयरोगाचे रुग्ण आहेत. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात अशा आजारांचा संसर्ग झपाट्याने होतो. क्षयरोगाची लागण रोखण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे. क्षयरोग रुग्णांचे निदान व्हावे, त्यांना उपचार मिळावेत यासाठी रोटरी क्लबने ‘टीबी भगाओ’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत ४ शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यातील पहिले शिबिर १३ सप्टेंबर रोजी रोटरी फाउंडेशनच्या क्षयरोगतज्ज्ञ डॉ. डेनिस अड्डो यांच्या उपस्थितीत भरविण्यात आले होते. पुढच्या एका वर्षात एकूण ३ हजार १४० शिबिरांचे आयोजन मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, डहाणू, पालघर आणि नवी मुंबईमधील ११० रोटरी क्लबद्वारे करण्यात येणार आहे. क्षयरोगाच्या बरोबरीनेच फुफ्फुसाला होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी क्लबकडून ठोस उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. या शिबिरांमध्ये रुग्णांचे क्षयरोग निदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने एक्स-रे काढण्यात येईल. ज्यांना क्षयरोगाचा धोका असल्याचे निदान होईल त्यांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात येईल. शिबिरांच्या बरोबरीने टीबीविषयक जनजागृती कार्यक्रम राबविले जात आहेत. प्रमोद लेले आणि डॉ. श्रीपाद बोडस यांनी सांगितले की, मुंबईत फुफ्फुसाच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. एका शिंकण्यातून क्षयाचे ४० हजार जीवाणू बाहेर पडतात. याविषयी जनजागृती करून क्षयाला रोखण्यासाठी रोटरी क्लबने ही मोहीम सुरू केली आहे. (प्रतिनिधी)
राज्यात टीबीचे १ लाख ३६ हजार रुग्ण
By admin | Updated: September 19, 2015 03:33 IST