जानेफळ (जि. बुलडाणा) : दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे अकरावीत प्रवेश मिळत नसल्याने शिक्षणापासून वंचित रहावे लागणार, या नैराश्यापोटी घाटनांद्रा ता. मेहकर येथील एका विद्यार्थिनीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना घडली. जया विजय राठोड असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे. जया खामगाव येथून दहावी उत्तीर्ण झाली होती. मात्र, तिला ४५ टक्के गुण मिळाले होते. कमी गुण मिळाले, तरीही जयाला पुढे शिकण्याची जिद्द होती व तसे तिने वडिलांना सांगितले होते. त्यामुळे विजय राठोड यांनी तिच्या अकरावीच्या प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले. अनेक महाविद्यालयांच्या पायर्या झिजवूनही गुण कमी असल्याने तिला प्रवेश मिळण्यात अडचणी येत होत्या. अनेक महाविद्यालयांनी त्यांना डोनेशनही मागितल्याची माहिती आहे; परंतु आर्थिक क्षमता नसल्याने राठोड महाविद्यालयांची डोनेशनची अट पूर्ण करू शकले नाहीत.वडिलांची होणारी फरपट पाहून व आता शिक्षणापासून वंचित राहावे लागणार, यामुळे जया निराश झाली होती. या नैराश्यातूनच अखेर २५ जुलै रोजी सकाळी घरातील सर्व जण झोपेत असताना घराशेजारच्या विहिरीत तिने आत्महत्या केली. केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहण्याच्या भीतीने जयाने आत्महत्या केली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गरिबीने घेतला बळी!एसटी बसची पास काढण्यासाठी वडिलांकडे पैसे नसल्यामुळे मागील वर्षी एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. अशीच काहीशी घाटनांद्रा येथील ही घटना आहे. मृतक जया राठोड हिचे वडील अल्पभूूधारक आहेत. मागील दोन वर्षांपासून नापिकीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. मागील वर्षी पेरणीसाठी काढलेले बँकेचे ५0 हजार रुपये कर्ज डोक्यावर आहे. यावर्षी सुद्धा पेरणीसाठी उसणवारी करावी लागली. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे विजय राठोड यांना मुलीच्या शिक्षणाला पूर्णविराम द्यावा लागणार होता. मुलींच्या शिक्षणावर शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. तरीही गरिबीमुळे अनेक मुली शिक्षणापासून वंचित राहत आहेत. याच गरिबीमुळे आज पुन्हा एका सावित्रीला आपली जीवनयात्रा संपवावी लागली.
अकरावीत प्रवेश न मिळाल्यामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या
By admin | Updated: July 26, 2016 01:56 IST