पाच जून हा दिवस संपूर्ण विश्वात जागतिक पर्यावरण दिन सोहळा म्हणून साजरा केला जातो. खरेतर, बदलत्या हवामानाची, पर्यावरणाची नोंद ५ जून १९७२ रोजी स्टॉक होम येथे घेण्यात आली. त्या दिवसापासून ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन सोहळा म्हणून साजरा केला जाऊ लागला. म्हणजेच जवळजवळ ४३ वर्षांपूर्वी बदलत्या पर्यावरणाची नोंद मानवाने घेतली. परंतु या चार दशकांच्या वाटचालीत आपण समृद्ध पर्यावरणाच्या संरक्षणाकरिता खरंच मनापासून प्रयत्न केले का? हा विचार करण्यासाठी या दिवसाचे औचित्य खूप महत्त्वाचे आहे. वास्तविक पाहता वैश्विक पातळीवरच अखिल मानवजातीने विकासाच्या वाटचालीत बदलत्या पर्यावरणाचे भान राखले नाही असेच म्हणावे लागेल. आपण किमान आपल्या राज्यापुरता विचार केला तरी वर्तमानातील जीवनात गेल्या १० वर्षांत झपाट्याच्या प्रगतीने आपण मोठी महानगरे लोकसंख्येने भरून टाकली, पण त्याच्या जोडीला मानवी मूलभूत गरजा भागविण्यासाठी नैसर्गिक संसाधने, वापरलेल्या वस्तंूचे विघटन किंवा विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना, सांडपाण्याचे शुद्धीकरण, पिण्याच्या पाण्याचे नियोजन याबाबत आपण करीत असलेले प्रयत्न निश्चितच तोकडे आहेत. त्याचे कारण बदलत्या परिस्थितीत पर्यावरणाचे व प्रदूषणाचे प्रश्न कमी होण्यासाठी नियोजनाचा अभाव व त्याला व्यापक लोकसहभागाची नितांत गरज आज अधोरेखीत होत आहे. आपण अत्यंत साध्या गोष्टींकडे लक्ष वेधू. किमानपक्षी आपण केवळ स्वच्छतेचा जरी विचार केला तरी ती स्वच्छता अंगी बाणविणे हे आपल्या प्रत्येकाचे अंगीभूत कर्तव्य असणे आवश्यक आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरच्या भाषणात भारताच्या स्वच्छतेबाबत केलेले भाष्य आणि त्यावर स्वच्छ भारत अभियानाची घोषणा निश्चितच गौरवास्पद म्हणायला हवी. आज स्वच्छतेची समस्या ही केवळ मोठ्या शहरांपूर्तीच मर्यादित नसून हा प्रश्न छोटी, मध्यम शहरे, ग्रामीण विभाग यांनादेखील भेडसावतो आहे. याला कारण आपली न बदललेली मानसिकता. पर्यावरणाचे दिन साजरे करताना एखादा संकल्प घेऊन आपण वर्षभर काम करणे आवश्यक आहे. या वर्षीच्या पर्यावरण दिनी किमान स्वच्छतेचा संकल्प करून आपण पुढील वर्षभरात स्वच्छ भारताची मोहीम हाती घेतली तरी यातून निश्चितच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण याकरिता दृढ संकल्पाची नितांत गरज आहे. स्वच्छ घर, स्वच्छ गाव, स्वच्छ शहर, स्वच्छ राज्य, तरच स्वच्छ व निर्मळ राष्ट्र निर्माण करणे १२0 कोटी जनतेला सहज शक्य आहे. स्वच्छतेबरोबरच दुसरा महत्त्वाचा प्रश्न प्लॅस्टिक पिशव्यांचा. या प्रश्नाविषयी शासकीय स्तरावर अनेक कडक उपाययोजना, कायदे अस्तित्वात आहेत. पण जोपर्यंत लोकसहभागाची साथ मिळत नाही तोपर्यंत या प्रश्नाचे उत्तर सहज साध्य होणार नाही. राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुंबई शहरातील प्लॅस्टिक पिशव्या निर्मूलनासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. याकरिता ५0 मायक्रॉनच्या खाली प्लॅस्टिक पिशवी उत्पादकांवर कायदेशीर कारवाईचा दंडुका उगारल्यानंतर हे उत्पादक नामोहरम झाले आहेत. परंतु रामदास कदम यांनी उचललेल्या या धडक मोहिमेला लोकसहभागानेदेखील तितकीच मदत करणे आवश्यक आहे. शेवटी मंत्रिमंडळात काम करणारे मुख्यमंत्री, मंत्री, इतर लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी हेदेखील समाजात राहणारे एक नागरिकच आहेत. आपण सर्वसामान्य नागरिक मात्र प्रत्येक गोष्ट शासनाने केली पाहिजे असे म्हणत आपला व्यक्तिगत सहभाग टाळत असतो. हा प्रश्न कुणी कुणाला विचारायचा हाच खरा प्रश्न आहे. उदा. आपल्या आवडत्या क्रिकेट खेळाचेच घेऊ या. जेव्हा मैदानात संघातील ११ खेळाडू सांघिक भावनेतून जिंकण्याचे एकच लक्ष्य ठेवून खेळतात तेव्हा तो संघ समोरच्या संघाला निश्चितच पराभूत करतो. पण त्याच संघातील ११ खेळाडूंनी जिंकण्याचे एकच लक्ष्य न ठेवता खेळ खेळला तर त्यांचा पराभव निश्चित ठरलेला असतो. त्याचप्रमाणे शासनाने पर्यावरण रक्षणासाठी निर्माण केलेले कायदे हे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन समाधानकारक व्यतीत व्हावे या उद्देशानेच या कायद्यांची तरतूद करण्यात आलेली असते. पण या कायद्यांची अंमलबजावणी करण्याकरिता प्रामाणिकपणे, कसोशीने व राष्ट्रीयत्वाच्या भावनेने प्रयत्न केल्यास पर्यावरण व प्रदूषणाचे प्रश्न सहज सोडविता येतील. भारत हा देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे असे आपण नेहमी म्हणतो. पण या वाटचालीत आपण इथल्या मातीवर, निसर्गावर, नैसर्गिक संसाधनांवर, पाण्याच्या नियोजनावर जोपर्यंत मनस्वी प्रेम करीत नाही तोपर्यंत भारत महासत्ता होईल पण त्याच्यासोबत अनेक प्रश्नांनी त्याला घेरलेले असेल. याकरिता आपले राष्ट्रीयत्व म्हणजे आपल्या घराबरोबरच आपल्या सभोवतालची स्वच्छता, निसर्गाला हानी पोहोचेल अशा वस्तूंचा वापर टाळणे, पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन आणि निसर्गाची पूजा हीच मानवाची पूजा अशी जीवनशैली अंगीकारल्यानंतर आपण केवळ महासत्ता नव्हे, तर जगावर राज्य करू शकतो; कारण आपल्या देशाची प्राचीन संस्कृती, परंपरा, पराक्र म, इतिहास, राष्ट्रीय एकात्मता, स्वातंत्र्य चळवळ ही आपली बलस्थाने आहेत हे आपण विसरता कामा नये. जे राष्ट्र इतिहासाला साक्षी ठेवून वर्तमानात भविष्याचा सकारात्मक वेध घेते, तेच राष्ट्र उज्ज्वल पिढीची मुहूर्तमेढ वर्तमानात रु जवत असते. म्हणून प्रश्न पर्यावरणाचा असो किंवा प्रदूषण नियंत्रणाचा याबद्दल वैचारिक मंथन केवळ जागतिक पर्यावरण दिनी न करता तो आपला दैनंदिन, वार्षिक दृढ संकल्प हवा निर्सग रक्षणाचा, समृध्द वसुंधरेच्या वरदानाचा. संजय भुस्कुटे
दृढ संकल्प हवा निर्सग रक्षणाचा, समृध्द वसुंधरेच्या वरदानाचा
By admin | Updated: June 5, 2015 01:44 IST