सतीश डोंगरे,
नाशिक- सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून गोंधळी समाजाने हुंडाविरोधी चळवळ सुरू केली आहे. हुंड्यासारख्या अनिष्ट पद्धतीला विरोध करण्यासाठी समाजातील समविचारी लोकांनी एकत्र येऊन ‘व्हॉट्स अॅप आणि हाईक’वर ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुपमध्ये देशभरातील समाजातील लोक सदस्य आहेत.गोंधळी समाजात ‘नवऱ्या मुलाला महागडी वस्तू देणे किंवा वधूकडच्या लोकांनी लग्नात दोन्ही बाजूंचा खर्च करण्याची अट घातली जाते. ही प्रथा दूर करण्यासाठी येथील विजय रेणुके यांनी सोशल मीडियावर हुंडाविरोधी चळवळ उभारण्याचे ठरविले. त्यांनी व्हॉट्स अॅपवर ‘शुभमंगल गोंधळी’ नावाने गु्रप तयार केला. ग्रुपच्या माध्यमातून इच्छित वधू-वर शोधले जाऊ लागले; मात्र त्याचबरोबर हुंडाविरोधी सूरही उमटू लागला. त्यानंतर ग्रुपचे नाव ‘हुंडाविरोधी वधू-वर (गोंधळी)’ असे ठेवण्यात आले. ग्रुपमधील सदस्यांची वाढती संख्या लक्षात घेता ‘हाईक’च्या माध्यमावर हा ग्रुप सध्या चालविला जात आहे. ग्रुपमध्ये वधू-वरांचा सहभाग अधिक असून समाजात व्यापक जनजागृती करण्याचे काम केले जात आहे. >२६० सदस्य‘हुंडाविरोधी वधू-वर ग्रुपमध्ये (गोंधळी)’ राज्यातील तब्बल २६० सदस्य आहेत. त्यात २० टक्के पालकांचाही समावेश आहे. ही सर्व मंडळी ‘हुंडा देणार नाही अन् घेणारही नाही’ या तत्त्वाप्रमाणे ग्रुपमध्ये सहभागी झाले आहेत. वर्षभरापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून चळवळ चालविली जात आहे. ‘हुंडाविरोधी वधू-वर (गोंधळी)’ या ग्रुपमुळे समाजात हुंडाविरोधी गट निर्माण झाला आहे. हुंड्यामुळे होणारे दुष्परिणाम एकमेकांना शेअर केले जात असल्याने लोकांमध्ये चांगल्या पद्धतीने जनजागृती होत आहे. ग्रुपच्या सदस्यांची संख्या सतत वाढत आहे. समाजातील लोक हुंडा पद्धतीला कडाडून विरोध करीत असल्याचे बघावयास मिळत आहे. - विजय रेणुके, ग्रुप अॅडमिन