ठाणे : विधान परिषदेच्या निवडणुकीत एकीकडे शिवसेनेने मताधिक्य अधिक घेतल्याचा दावा केला असला आणि त्यांच्या जादा मतांवरून राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसवर दोषारोप सुरू केले असले तरी दुसरीकडे शिवसेनेने गृहीत धरलेल्या कोट्यातील विधान परिषदेची मते फुटल्याचे स्पष्ट झाल्याने त्यावरून युतीत धुसफूस सुरू झाली आहे. भाजपाच्या नेत्यांनी मतांच्या फाटाफुटीबाबत मौन बाळगले असून आमची मते फुटलेली नाही, असे सांगत सर्व दोष शिवसेनेवर ढकलला आहे. निवडणुकीत शिवसेनेने जादा मते खेचल्याचे सांगत विजयाबद्दल जल्लोष केला. मात्र राष्ट्रवादीला कमी मते पडलेली असतांनाही वसंत डावखरे यांनी शिवसेनेची सुमारे १०० मते फोडल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे नेते खाजगीत ४० च्या घरात मते फुटल्याचे मान्यही करीत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गोटातील उरलेली ६० ते ६५ मते कोणाची हा संभ्रम कायम आहे. शिवसेनेचे नेते थेट काही न बोलता त्याचे खापर भाजपा नेत्यांवर फोडत आहेत. तर भाजपा नेत्यांनी युतीधर्म पाळल्याचे सांगत मतांच्या फाटाफुटीबाबत कानावर हात ठेवले आहे. यंदा सर्वच मतांची एकत्रित मोजणी झाल्याने फुटलेल्या मतांचा शोध घेणे दोन्ही पक्षांना अवघड बनले आहे. त्यामुळे फुटलेल्या मतांचा माग काढूनही कोणाची मते फुटली हे मात्र गुलदस्त्यातच आहे आणि हाती पुरावे नसल्याने खापर फोडणेही कठीण बनले आहे. डावखरेंना काँग्रेस- राष्ट्रवादीच्या ठाणे-नवी मुंबईतील काही स्वहीत जपणाऱ्या गटांनी दगा दिल्याचे बोलले जाते. तुलनेत वसईच्या हितेंद्र ठाकूर यांनी डावखरे यांची भक्कम पाठराखण केली. मतमोजणी केंद्रात उमेदवार रवींद्र फाटक आणि वसंत डावखरे एकत्रच बसले होते. १०५७ मतांपैकी ६ मते बाद ठरून १०५१ मतांची मोजणी सुरु झाली. पहिल्या फेरीत फाटक यांना ३११ मते, तर डावखरे यांना १८९ मते मिळाल्याने १२२ मतांची आघाडी तेथेच मिळाली. मात्र त्याचा तपशील उघड झाला नाही.निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये गेलेले राष्ट्रवादीतील नेते डावखरे यांना मदत करतील, अशी अटकळ होती. मात्र त्यांनी कसोशीने पक्षनिष्ठा पाळल्या. बाहेरून येणाऱ्यांना पदे मिळाल्याने नाराज निष्ठावंतांनी पक्षाला इशारा दिल्याचे मानले जाते. त्यातही शिवसेनेने वेळोवेळी नाक दाबल्याने काही नेत्यांनी गुपचूप तोंड उघडल्याची चर्चा आहे. पण भाजपाच्या नेत्यांनी याबाबत पूर्णत: मौन बाळगले आहे. शिवसेनेला हवा तो इशारा पोचल्याची खात्री मात्र त्यांनीकरून घेतली आहे. (प्रतिनिधी)>काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात... घोडेबाजाराची कबुली?ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या स्थापनेपासून त्यावर वर्चस्व ठेवलेल्या वसंत डावखरे यांचा शिवसेना-भारतीय जनता पक्ष महायुतीच्या रवींद्र फाटक यांनी तब्बल १५१ मतांनी पराभव केला. पक्षीय बलानुसार शिवसेनेकडे ३११, भारतीय जनता पक्षाकडे १८० आणि रिपब्लिकन पक्षाकडे आठ असे ४९९ सदस्य युतीकडे होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे १९९, काँग्रेसकडे १०३ आणि बहुजन विकास आघाडीकडील १२५ सदस्य धरून आघाडीचे बळ ४२७ च्या घरात होते. उर्वरित ६२ मते इतर छोटे पक्षांची आणि ४८ मते अपक्षांची होती. शिवसेनेच्या फाटक यांनी अपेक्षेपेक्षा १०१ मते अधिक मिळवल्याने विरोधकांची मते फुटल्याचे उघड झाले. याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना छेडले असता त्यांनी यावेळी फाटकांचे डाव खरे ठरले, असे सांगत हे गुप्त मतदान असल्याने काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात, असे सूचक उद्गार काढत घोडेबाजार झाल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली होती.
फुटलेल्या मतांवरून शिवसेना-भाजपामध्ये धुसफूस
By admin | Updated: June 9, 2016 03:51 IST