मयूर तांबडे,
पनवेल- पनवेलमधील २३ ग्रामपंचायतींचा समावेश करून रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका म्हणून पनवेल महापालिका स्थापन झाली आहे. मात्र २३ ग्रामपंचायतींमधील २९ गावांच्या समस्यांचे कोडे अद्याप सुटलेले नाही. कचरा, स्वच्छता, वीज, रस्ते, यासारख्या समस्या गावांमध्ये भेडसावू लागल्या आहेत. यासाठी पनवेल महापालिकेकडे हस्तांतरण झालेल्या महसुली गावांना सुविधा पुरविण्यासाठी पालिकेकडून सहा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या २९ गावांना महिन्याभरापासून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जन्म तसेच विवाह व मृत्यूच्या दाखल्यांची कामे रखडलेली असल्याचे नागरिक सांगतात. यासाठी महापालिकेने ६ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. गजानन कोळी यांना पनवेल हद्दीतील पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, धाकटा खांदा, मोठा खांदा, मौजे काळुंद्रे गावाची हद्द, कामोठे गावाची हद्द दिली आहे. श्रीराम हजारे यांना खारघर महसूल हद्द, ओवे गावाची हद्द, तळोजे पाचनंद गावे दिली आहेत. गजानन घरत यांना कळंबोली, आसुडगाव, रोडपाली, खिडूकपाडा गावे दिली आहेत. सुरेश गांगरे यांना नावडे, पडघे, वळवली, टेंभोडे, पालेखुर्द, देवीचा पाडा, गावे तर संजय देशमुख यांना रोहिंजण, अडीवली, धानसर, बीड, पिसार्वे, तुर्भे, करवले बुद्रुक गाव आणि रमेश पाटील यांना तळोजे मजकूर, तोंडरे, नागझरी, घोट, चाळ, कोयनावेळे, पेंधर गावे दिली आहेत.