मुंबई : ब्रँडेड आणि महागड्या औषधांना पर्याय म्हणून राज्य सरकारने जेनेरिक औषधांची कूस धरली. ही औषधे स्वस्तात उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासनाचा मानस होता, मात्र सध्या बाजारात या औषधांचा तुटवडा असल्याचा आरोप महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मसी असोसिएशनने केला आहे. यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत असल्याची स्थिती पाहायला मिळते आहे. ब्रँडेड कंपन्यांच्या तुलनेत जेनेरिक औैषधे ३० ते ४० टक्के स्वस्त मिळतात. खर्चात बचत होण्याकरिता रुग्णांनी जेनेरिक औषध घेण्यास सुरुवात केल्यास अनावश्यक खर्च टाळता येईल. मात्र सध्या ब्रँडेड कंपन्या जाहीरातबाजी करण्यासाठी अमाप पैसा खर्च करत असल्याने याचा भुर्दंड रुग्णांना भरावा लागतो. शिवाय, सरकारने जेनेरिक औषधांचा साठा वाढविला पाहिजे. त्यामुळे ही औषधे रुग्णांपर्यत पोहोचण्यास मदत होईल, असे फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
बाजारात जेनेरिक औषधांचा तुटवडा
By admin | Updated: January 4, 2017 01:38 IST