पुणे : शहरांमध्ये वेगाने होणारे काँक्रिटीकरण आणि सांडपाण्याचा शून्य टक्के पुनर्वापर यामुळे पाणीटंचाईच्या समस्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. काँक्रिटीकरणामुळे जमिनीत पाण्याचे पुनर्भरण होत नाही. काँक्रिटीकरण टाळल्यास आणि इस्राईलप्रमाणे सांडपाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर केल्यास पाण्याची समस्या सुटू शकेल, असे मत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले.‘आम्ही एकपात्री’ या एकपात्री कलाकारांच्या राज्यस्तरीय संस्थेच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त ‘पाणी वाचवा’ या अभियानास प्रारंभ करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी टाटा एआयए इन्श्युरन्स संस्थेच्या ज्योती वझे उपस्थित होत्या.संस्थेच्या कलाकारांनी मनोरंजनातून सामाजिक प्रबोधन करत ‘थेंब थेंब पाणी वाचवू’ हा संदेश् देत ‘हास्यवर्षाव’ हा विनोदी कार्यक्रम सादर केला. त्यामध्ये बंडा जोशी, वंदन राम नगरकर, संतोष चोरडिया, उज्वला कुलकर्णी, मारुती यादव, मोनिका जोशी, चंद्रकांत परांजपे, श्ेखर केदारी या कलाकारांनी रसिकांना खळखळून हसवले. संगीत संयोजन धनश्री मुंदडा तर कीर्ती रामदासी यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)
सांडपाण्याचा पुनर्वापर आवश्यक
By admin | Updated: April 30, 2016 00:37 IST