मुंबई : २६/११ हल्ल्यानंतर पश्चिम किनाऱ्यावरील सुरक्षा मजबूत करण्यात आली असून, मुंबईला कुठलाही धोका नसल्याचे पश्चिम विभागाचे कमांडिंग आॅफिसर व्हाइस अॅडमिरल अनिल चोप्रा यांनी सांगितले. नौदल सप्ताहानिमित्त नौदलाकडून आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू युध्दनौकेवर चोप्रा यांच्याशी वार्तालाप ठेवण्यात आला होता. या वेळी त्यांनी ही माहिती दिली. नौदलाच्या परवानगीशिवाय मुंबईच्या किनाऱ्यावर अनोळखी युध्दनौका घुसू शकणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील समुद्रातून व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात जहाजांची वाहतूक वाढली आहे. ही वाहतूक वाढली तरी नौदल आपली जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडत आहे. मोठ्या प्रमाणात मासेमारी करणाऱ्या बोटींची संख्याही मुंबईतील किनाऱ्यांवर वाढली आहे. यातील बोटींना काही अडचण आल्यास त्याची माहिती घेण्यासाठी आधुनिक यंत्रणा कार्यान्वितही करण्यात आल्याचे चोप्रा यांनी सांगितले. सर्वात मोठी विमानवाहू युध्दनौका असलेली आयएनएस विक्रमादित्य नौदलात दाखल झाल्यामुळे नौदलाची ताकदही वाढली आहे. भारताचे आरमार हे जगातील सर्वात मोठे असे पाचवे आरमार असून दुप्पट विमाने, हेलिकॉप्टर आणि २00 युध्दनौका आहेत. मात्र या संख्याबळावरून ताकद ठरवणे चुकीचे असून त्याची क्षमता किती आहे यावरून ताकद समजते, असेही चोप्रा यांनी मत यावेळी मांडले.
पश्चिम किनाऱ्यावरील सुरक्षा भक्कम
By admin | Updated: December 4, 2014 03:03 IST