मुंबई : मागील अनेक वर्षांपासून मुंबईतील रेल्वेच्या पायाभूत सेवा-सुविधांचा विकास करण्यासाठी निधी देण्यात आलेला नाही. परिणामी, रेल्वे मार्गांकडे दुर्लक्ष झाले आहे. आता मात्र, अशी चूक होऊ देणार नाही, अशी ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. मुंबईतील रेल्वेच्या विकासासाठी राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांच्या एकत्रित प्रयत्नातून ३० हजार कोटींचा निधी उभारण्यात येणार असल्याचेही प्रभू यांनी सांगितले. कांजूर मार्ग आणि विद्याविहार स्थानकातील प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यावेळी सुरेश प्रभू बोलत होते. दादर येथे शनिवारी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी व्हिडीओद्वारे या प्रकल्पांचे लोकार्पण केले. सुरेश प्रभू यांनी या वेळी प्रवाशांना तत्काळ माहिती मिळेल, अशा सुविधेची घोषणा केली. आता रेल्वे का खोळंबली आहे, याची माहिती देणारे फलक फलाटांवर लावले जाणार आहेत. याच फलकावर रेल्वेसेवा कधी पूर्ववत होईल याचीही माहिती प्रवाशांना दिली जाणार आहे. प्रवाशांचा खोळंबा होऊ नये, चिडचिड कमी व्हावी आणि त्याचबरोबर स्टेशन मास्तरांची डोकेदुखी कमी व्हावी यासाठी ही सुविधा देण्यात येणार आहे. याचबरोबर रेल्वे प्रशासन करत असलेल्या विकासकामांच्या फलकांचाही यात समावेश असणार आहे, असे प्रभू यांनी सांगितले.वर्षानुवर्षे स्टेशन मास्तरांच्या पांढऱ्या युनिफॉर्मचा रंग आता बदलणार आहे. त्यामुळे यापुढे स्टेशन मास्तर वेगळ्या रंगाच्या युनिफॉर्ममध्ये दिसणार आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या फॅशन डिझायनर रितू बेरी यांच्याशी युनिफॉर्मविषयी चर्चा सुरू असल्याचेही प्रभू यांनी स्पष्ट केले. युनिफॉर्ममध्ये तर बदल होणार आहेतच त्याचबरोबरीने त्यांच्या अधिकारांतही वाढ करण्यात येणार आहेत. त्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही प्रभू यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)
रेल्वेसाठी ३० हजार कोटींचा निधी उभारणार
By admin | Updated: May 15, 2016 04:50 IST