वसंत भोईर,
वाडा- तालुक्यातील पेठ रांजणी या गावात कुपोषणाने दगावलेली रोशनी सवर (२) हिचा बळी सरकारी अनास्थेमुळेच झाला असून तीच्या मृत्यूचे वृत्त गुरूवार दि.१५ लोकमतमध्ये प्रसिध्द झाल्यानंतर लगेचच आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी या कुटुंबाला भेटले परंतु त्याला कोणतीही मदत न करता परतल्याने या कुटुंबाला आजही मृत्यूशी झुंज देतच जगावे लागते आहे. गुरूनाथ सवर यांचे अत्यंत दारीद्रयाने पिचलेले कुटुंब असून सरकारी योजना त्यांच्यापासून कोसोमैल दूर आहेत. गेल्या २० वर्षापासून या कुटुंबाला साधे रेशनकार्ड नाही. त्यामुळे त्यांना रेशनचे धान्य मिळत नाही. रेशनकार्ड मिळावे म्हणून त्यांच्या वडिलांनी दोन वेळा तहसिल कार्यालयाकडे अर्ज करून अनेक हेलपाटे मारले होते. मात्र सरकारी अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळै त्यांचे हे प्रयत्न अपयशी ठरले. तेव्हा पासून हे कुटुंब रेशिनिंग पासून वंचित आहे. आता रेशनकार्ड मिळावे म्हणून पुन्हा अर्ज विनंत्या करणार असल्याचे सवर यांनी सांगितले.त्याच प्रमाणे रोजगार नसल्याने वारंवार या कुटुंबाला रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत आहे. कारण शासनाची गावातच रोजगार देण्याची रोजगार हमी योजनाही निटपणे येथे कार्यान्वीत होवू शकलेली नाही. तसेच आजही हे कुटुंब एका साध्या झोपडीत राहत असून घरकुल योजनेचाही लाभ या कुटुंबाला मिळालेला नाही. पोषण आहार योजनाही कागदावरच आहे.रोशनीचे वडील गुरूनाथ सवर यांच्याशी संपर्क साधला असता, ‘आम्ही दारीद्रयाशी झगडतो आहोत त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत करत आहोत. परंतु आमच्या प्रयत्नांना शासनाची साथ मिळत नाही. अजूनही मला घरकुल योजनेचा लाभ मिळाला नसल्याने मी झोपडीतच राहतो. गेल्या २० वर्षापासून रेशनकार्ड नसल्याने रोजगारासाठी स्थलांतरीत व्हावे लागते. त्यामुळे माझे दारीद्रय कायम असल्याची खंत सवर यांनी व्यक्त केली. मंत्री महोदय येणार असल्याने आमच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, काहीच आश्वासन न दिल्याने आमचा भ्रमनिरास झाला असल्याची प्रतिक्रिया सवर यांनी दिली.>निधीअभावी अमृत आहार योजना कागदावरच गतवर्षी आदिवासी विकास विभागाने मोठा गाजावाजा करून आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची घोषणा केली होती परंतु निधीच अजून पर्यंत उपलब्ध झाला नसल्याने ही योजना कागदावरच दिसत आहे. रोशनची आई ममता सवर ही आठ महिन्याची गरोदर असतांना तिला सहाव्या महिन्यापासून अमृत आहार योजना सुरू व्हायला हवी होती. मात्र निधी अभावी तीला पोषण आहार मिळू शकला नाही. आता रोशनीच्या मृत्यू नंतर जाग आलेल्या प्रशासनाने तातडीने तीला आता पोषण आहार सुरू केला आहे.पिडीत कुटुंबीयांच्या घरी भेटीला गेलेल्या सवरांनी पोषण आहार सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र, त्याच वेळी अंगणवाडी सेविकांना योजनेचा निधीच मिळत नसल्याने उसनवारी करून ही योजना राबवावी लागत असल्याचे यावेळी उघड झाले. त्यामुळे आदिवासी विकास विभागाची ही योजना निधी अभावी कागदावरच सुरू असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात वाडा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप जाधव यांच्याशी संपर्क साधला असता रोशनी कुपोषित होती. तिला श्वसनाचा त्रास होत होता त्यामुळे तीला उपचारासाठी दाखल केले होते. त्रास वाढल्याने तीला ठाणे येथे उपचारासाठी पाठवले असता वाटेतच तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांनी दिली.