कोल्हापूर : शहरात आयआरबी कंपनीने केलेल्या रस्त्यांचे मूल्यांकन करारावर आधारित निविदेतील दराप्रमाणे २५९ कोटी ७५ लाख इतके होत असले तरी खराब कामे आणि न केलेल्या कामांचे १२९ कोटी रुपये त्यातून वगळावेत, अशी मागणी गुरुवारी सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीच्या प्रतिनिधींनी राज्य सरकारकडे केली. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या मूल्यांकन समितीने प्रत्यक्ष झालेल्या कामाचे डीएसआर प्रमाणे २३९ कोटी ६२ लाख रुपयांचे मूल्यांकन केले होते. परंतु याला आयआरबीने हरकत घेऊन निविदेतील दराप्रमाणे झालेल्या रस्त्यांचे मूल्यांकन करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने कृती समिती व कोल्हापूर महानगरपालिका यांना आयआरबीच्या म्हणण्यानुसार मूल्यांकन करून अहवाल देण्यास सांगितले होते. त्यानुसार गेले दोन दिवस रात्रंदिवस तयार केलेला अहवाल गुरुवारी राज्य सरकारकडे सादर केला. ‘एमएसआरडीसी’च्या बांद्रा येथील कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहसचिव एस. जी. तामसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा अहवाल देण्यात आला. बैठकीस आमदार चंद्रदीप नरके, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य अभियंता ओहोळ, एन. आर. भांबुरे, कृती समितीचे सदस्य राजेंद्र भांबुरे, प्रसाद मुजुमदार, आदी उपस्थित होते. कृती समितीच्या सदस्यांनी नोबेल कंपनीच्या सर्वेक्षणावर आधारित करारातील रस्ते बांधणी खर्चावर येणारी रक्कम २५९ कोटी ७५ लक्ष रुपये होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वेगवेगळ्या बांधकाम साहित्याच्या थरांच्या कमी जाडीमुळे कमी होणारी किंमत, कराराप्रमाणे आवश्यक त्या ठिकाणी तांत्रिक स्पेशिफि केशनप्रमाणे न केलेल्या कामांची किंमत, जागेवर न दिलेल्या सुविधांची किंमत, आजपर्यंत देखभालीचा खर्च याची होणारी एकू ण किंमत १२० कोटी ३९ लाख होते. ही रक्कम एकूण खर्चातून वळती केल्यास केवळ १३९ कोटी ३५ कोटी रुपये होते. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना या गोष्टींचा विचार करावा लागेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. शिवाय आयआरबीला देण्यात आलेल्या भूखंडाची बाजारभावाप्रमाणे होणारी किंमत प्रकल्प खर्चात धरून मगच निश्चित रक्कम ठरविणे योग्य ठरेल, असेही अहवालात म्हटले आहे. रस्त्यांच्या कामाचे झालेल्या सर्वेक्षणातून आता दोन रकमा निश्चित झाल्या आहेत. डीएसआरप्रमाणे २३९ कोटी ६२ लाख रुपये, तर निविदेतील दराप्रमाणे २५९ कोटी ७५ लाख रुपये मूल्यांकन निश्चित झाले आहे. त्यातून आता मध्यम मार्ग काढण्यात येईल, असे सांगण्यात येते. (प्रतिनिधी)
रस्त्यांचे मूल्यांकन २५९ कोटींवर
By admin | Updated: August 20, 2015 23:24 IST