मुंबई : प्रत्येक वर्षाच्या १ मेपासून रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ करण्याची हकिम समितीने शिफारस केली; मात्र २0१३च्या मे महिन्यात ही वाढ न झाल्याने २०१४च्या मे महिन्यात किंवा त्यानंतरच्या महिन्यापासून तरी भाडेवाढ मिळेल, अशी आशा रिक्षा आणि टॅक्सी संघटनांना आहे. मात्र न्यायालयात भाडेवाढीबाबतचे प्रकरण अजूनही प्रलंबित असल्याने यंदाच्या मे महिन्यापासून होणारी भाडेवाढही लटकणार असल्याचे चिन्ह आहे. इंधनाचे दर, देखभाल खर्च आणि वाढता महागाई दर या सर्व घटकांचा विचार करता प्रत्येक वर्षाच्या १ मेपासून रिक्षा आणि टॅक्सींच्या भाड्यात वाढ करण्याची शिफारस हकिम समितीने केली होती. ही शिफारस २७ जुलै २०१२ रोजी केल्यावर आॅक्टोबर २०१२पासूनच रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर समितीच्या शिफारसीनुसार २0१३च्या मे महिन्यात भाडेवाढ मिळावी म्हणून रिक्षा आणि टॅक्सी संघटनांकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र २0१२च्या आॅक्टोबर महिन्यात भाडेवाढ झाल्यावर याविरोधात ग्राहक संघटनेकडून न्यायालयात धाव घेण्यात आली. त्यामुळे २०१२मध्ये भाडेवाढ करण्यात आली नाही. यंदा भाडेवाढ मिळावी यासाठी रिक्षा, टॅक्सी संघटना प्रयत्नशील आहेत. (प्रतिनिधी)
रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ लटकणार?
By admin | Updated: May 26, 2014 02:15 IST