मुंबई : ओला, उबर, टॅक्सी फॉर शुअरसारख्या कंपन्यांवर आणि अवैध वाहनांवर बंदी घालावी, यासह अन्य मागण्यांसाठी १५ फेब्रुवारीला मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनकडून रिक्षा बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद मुंबईपुरताच असल्याचे युनियनकडून स्पष्ट करण्यात आले. बंदमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्षा सहभागी होणार असल्याने, उपनगरवासीयांचे हाल होण्याची शक्यता आहे. अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असतानाही, ती रोखण्यात शासनाला अपयश आले आहे, असा आरोप मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनकडून करण्यात आला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, आॅटोरिक्षांच्या १ लाख नवीन परवान्यांचे वितरण त्वरित करावे, रिक्षा चालक-मालकांना पब्लिक सर्व्हंटचा दर्जा मिळावा, त्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, त्यांना कमी दरात घरे द्यावीत, तीन वर्षांपेक्षा अधिक काळ लायसन्स धारण करणाऱ्यांना त्वरित बॅच द्यावा, नूतनीकरणासाठी मुंबई महानगर क्षेत्रातील विजेता आॅटोरिक्षा चालकांकडून १५ हजार आणि अन्य विभागांतील चालकांकडून १० हजार रुपये घेण्याची अट रद्द करण्यात यावी, अशा मागण्या युनियनने परिवहन विभागाकडे केल्या आहेत. युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले की, बंदमध्ये ८३ हजार रिक्षा सामील होतील. परिवहन आयुक्तांशी चर्चा होणार आहे. मुंबईतील आरटीओकडेही युनियनचे सदस्य मागण्या सादर करतील. ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करू. (प्रतिनिधी)
रिक्षा बंदमुळे आज होणार हाल
By admin | Updated: February 15, 2016 08:20 IST