मुंबई : राज्याच्या मुख्य सचिव पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतरही स्वाधीन क्षत्रिय यांनी मंत्रालयासमोरील बंगला सोडला नाही. शासनाकडून दोन सदनिका मिळविल्या असतानाही, त्यांना अद्याप सरकारी निवासस्थानाचा मोह सुटत नसल्याने, विद्यमान मुख्य सचिव सुमित मलिक बंगल्याशिवाय कार्यरत आहेत. स्वाधीन क्षत्रिय मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाल्यानंतर, सरकारने २४ तासांमध्ये त्यांची ‘राइट टू सर्विस कमिशनर’ या पदावर नियुक्ती केली. त्याच्या जोरावर त्यांनी मंत्रालयाजवळील इमारतीतच मोठ्या सदनिकेची मागणी शासनाकडे केली आहे. मुख्य सचिवांसाठी असलेला राखीव बंगला त्यांनी सोडलेला नसून, १५ मेपर्यंत बंगल्यात राहण्याची परवानगी घेतली आहे. त्यामुळे नवीन मुख्य सचिव सरकारी बंगल्याच्या प्रतीक्षेत आहेत. स्वाधीन क्षत्रिय यांनी आपल्या मालमत्तेच्या विवरणपत्रात दोन सदनिकांचा उल्लेख केला आहे. वांद्रे पूर्व येथील साईप्रसाद इमारतीत एक सदनिका असून, त्या बदल्यात ते वर्षाला १२ लाख भाडे घेत आहेत, तर दुसरी सदनिका नवी मुंबईत सिडकोने नेरूळ येथे बांधलेल्या ‘वनश्री’ इमारतीत आहे. त्याचे वर्षाला आठ लाख भाडे मिळत आहे, असे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)आरटीआय कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्रशासकीय बंगल्यात राहणारे क्षत्रिय सरकारकडून मिळविलेल्या फ्लॅटच्या भाड्यातून वर्षाला २० लाख रुपये मिळवित असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते गलगली यांनी केला आहे. मुंबई व ठाणे विभागात मालकीचे घर असलेल्या अधिकाऱ्यांना शासकीय निवासस्थान देऊ नये, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
निवृत्तीनंतर सरकारी बंगला सोडवेना
By admin | Updated: April 23, 2017 02:35 IST