मुंबई : अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेले हक्काचे घर ताब्यात घेण्यासाठीही पुरेशी रक्कम जमविण्यात हतबल ठरत असलेल्या वृद्ध गिरणी कामगारांसाठी एक दिलासादायक बाब आहे. त्यासाठी लागणारी आवश्यक रक्कम भरण्यासाठी त्यांना आता आणखी १२० दिवस म्हणजे तब्बल चार महिन्यांची मुदतवाढ मिळणार आहे. त्यामुळे विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकारपत्र (पीओएल) मिळाल्यानंतर एकूण ३०० दिवसांचा अवधी मिळणार असून, त्यापैकी सुरुवातीच्या १२० दिवसांमध्ये कसल्याही व्याजाची आकारणी केली जाणार नाही.गिरणी कामगार व त्यांच्या वारसांच्या आर्थिक हालाखीच्या परिस्थितीमुळे अनेकांना घराच्या रकमेची पूर्तता करणे अशक्यप्राय बनल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, म्हाडा प्राधिकरणाच्या सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. दोन वर्षांपूर्वी म्हाडाने गिरणी कामगारांसाठी ६ हजार ९२५ घरांची सोडत काढली होती. साडेसात लाख रुपयांना त्यांना घरे देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आजतागायत ४,६५४ विजेत्यांना घराचा ताबा मिळाला आहे. उर्वरितांचा ताबा अर्जाची छाननी, रकमेची पूर्तता करण्याच्या कामात रेंगाळला आहे. छाननीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांना एकूण रकमेपैकी १० टक्के रक्कम भरण्यासाठी ‘पीओलएल’ मिळाल्यानंतर सुरुवातीला ३० दिवसांचा अवधी व त्यानंतर उर्वरित ९० टक्के रकमेच्या पूर्ततेसाठी ९० दिवसांचा अवधी देण्यात आला होता. त्यानंतर पैसे भरणाऱ्यांना संबंधित रकमेवर १३.५ टक्के व्याज आकारण्याची तरतूद होती. मात्र विजेत्यांना पणन विभागाकडून उशिरा पत्र जाणे, बहुतांश कामगार मुंबईबाहेर असणे आणि या व्यवहारासाठी निवडण्यात आलेल्या मुंबै बॅँकेच्या गलथान कारभारामुळे मुदतीत पत्रव्यवहार न झाल्याने त्यांना दोन्ही टप्प्यांतील रकमेच्या मुदतीसाठी अनुक्रमे ४५ व १०५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती.गेल्या वर्षी १२ जुलैला प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये त्यासाठी आणखी प्रत्येकी १५ दिवस म्हणजे १० टक्के रकमेसाठी ६० तर ९० टक्के रकमेच्या पूर्ततेसाठी १२० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. (प्रतिनिधी)
गिरणी कामगारांना मिंळाला दिलासा
By admin | Updated: August 26, 2014 02:46 IST