ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २४ - मुंबईत लोकलने प्रवास करणा-या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोकलने ८० किमी प्रवास करणा-या प्रवाशांना जुन्याच दराने तिकिटाचे पैसे मोजावे लागणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी मंगळवारी दिली.
मोदी सरकार सत्तेवर येवून एक महिन्याचा कालावधी लोटत नाही तोच केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडून १४.२ तिकीट दरवाढ करण्यात येणार असल्याची घोषणा होताच मोदी सरकारवर चौफेर टीका झाली. हेच का "अच्छे दिन" असे म्हणत सोशल मीडियावरही मोदी सरकारवर लोकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. भरमसाठ वाढीव दराचा पडणारा बोजा तुर्त तरी मुंबईकरांवरील टळला आहे. ८० कि.मी. पर्यंत प्रवास करणा-या लोकल प्रवाशांना जुन्याच दराने तिकिटाचे पैसे मोजावे लागणार आहे तर ८० कि.मी.पेक्षा जास्त प्रवास करणा-या प्रवाशांना १४.२ टक्के या वाढीव दराने तिकिट आणि पासचे पैसे मोजावे लागणार आहेत. दरवाढीचा निर्णय रद्द झाल्याने मुंबईकरांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, लोकलच्या फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना मात्र ही नवीन भाडेवाढ लागू होणार असल्याने त्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. त्यांच्यासाठी तिकीट आणि पासदरातील १४.२ टक्के भाववाढ कायम ठेवण्यात आली आहे