ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २० - दगड फेकणा-यांना जशास तसे उत्तर द्या, हात तोडा असे जाहीरपणे सांगणा-या नारायण राणेंची भाषा गुंडगिरीची असून ही गुंडगिरी संपुष्टात आणण्याची गरज आहे. जनतेने विधानसभा निवडणुकीत राणेंना धडा शिकवावा असे सांगत दीपक केसरकर यांनी राणेंना प्रत्युत्तर दिले आहे. माझ्यावर हीन दर्जाची टीका करणा-या राणेंवर ५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा करणार असेही त्यांनी सांगितले.
रविवारी कणकवली येथे नारायण राणेंनी कार्यकर्ता मेळावा घेतला. यात त्यांनी दीपक केसरकर यांच्यावर टीका केली. दीपक केसरकर यांचे कार्य काहीच नाही. प्रसिद्धीपायी ते माझ्यावर टीका करतात असे राणेंनी म्हटले होते. दहशतमुक्त सिंधुदुर्गचा नारा देणारे केसरकर जास्त वेळ तर गोव्यातच असतात असा खोचक टोलाही त्यांनी केसरकरांना लगावला आहे. दगड मारणा-यांना जशास तसे उत्तर द्या असे विधान त्यांनी केले. उद्धव ठाकरेंचे कर्तूत्व काय आहे असा सवाल विचारत मोदी कृपेमुळेच त्यांचे खासदार निवडून आले. शिवसेनेचे सिंधुदुर्गातील स्थानिक खासदारापेक्षा सरपंचही स्मार्ट असतो असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.
राणेंनी टीका केल्यावर दीपक केसरकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राणेंना प्रत्युत्तर दिले. 'माझी मुलगी गोव्याला राहत असल्याने मी गोव्याला जातो. राणे यांनी माझ्या कुटुंबावर अत्यंत हीन दर्जाची टीका केली असून यासाठी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करु असे केसरकर यांनी सांगितले. जनतेने विधानसभा निवडणुकीत राणेंना दिसू देऊ नये असेही केसरकर यांनी सांगितले.