संदीप प्रधान, मुंबईमहायुतीच्या मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांच्यात अक्षरश: तू तू मैं मैं झाल्याचे वृत्त आहे.वांद्रे-कुर्ला संकुलातील एका हॉटेलात सेनेचे नेते दिवाकर रावते, रामदास कदम, अनिल देसाई व संजय राऊत हे नियोजित वेळी पोहोचले. मात्र भाजपाच्या किंवा मित्रपक्षांच्या नेत्यांचा पत्ता नव्हता. अर्ध्या तासानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे दाखल झाले. त्यानंतर जवळपास पाऊण तासानंतर ओम माथूर बैठकीच्या ठिकाणी पोहोचले. यामुळे अगोदरच शिवसेना नेते अस्वस्थ झाले होते. सध्या शिवसेना व भाजपा नेत्यांमध्ये एकमेकांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याची अहमहमिका लागलेली आहे.बैठक सुरू होताच केवळ सात जागा मिळत असल्याने स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांच्या संतापाचा कडेलोट झाला. तुम्ही आम्हाला काय भिकारी समजता का? आम्ही तुमच्याकडे कटोरा घेऊन आलो नाही. दोन महिने आपली चर्चा सुरू आहे ती केवळ सात जागा देऊ करण्याकरिता का? शेट्टी यांचा आवाज चढल्याने शिवसेनेच्या रामदास कदम यांचे पित्त खवळले. तोंड संभाळून बोला. इतके टोकाचे बोलायचे असेल तर चर्चा कशाला करायची? तुमची भाषा बरोबर नाही, अशा शब्दांत कदम यांनी शेट्टींचा समाचार घेतला. लागलीच शेट्टी उठले आणि तरातरा लिफ्टकडे निघाले. त्यांच्यापाठोपाठ विनोद तावडे व आशिष शेलार धावत गेले. त्यांनी त्यांना विनंती करून हाताला धरून परत आणले. लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांना तुम्ही चार जागा दिल्या. त्या तर्कशास्त्रानुसार प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील सहा यानुसार किमान २४ विधानसभा मतदारसंघ सोडण्याची मागणी बैठकीत केली गेली. रिपाइंचे रामदास आठवले हे भोजनाला न थांबताच निघून गेले.
रामदास कदम - शेट्टी यांच्यात तू तू मैं मैं
By admin | Updated: September 25, 2014 09:19 IST