भोर : तालुक्यात मागील २० ते २५ दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने २ दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र दमदार हजेरी लावल्याने भातखाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. पश्चिम भागातील भाताच्या रखडलेल्या लावण्या पुढील आठवड्यात सुरू होतील, तर पूर्व भागातील खरीप पिकांच्या पेरण्या सुरू झाल्या असून बळीराजा सुखावला आहे.पावसाअभावी भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरा देवघर व भाटघर धरण परिसरातील गावांत इतर ठिकाणी धूळवाफेवर सुमारे ६५० हेक्टरवर भाताची पेरणी झाली होती. मात्र, वळवाचा पाऊस न पडल्याने रोपांची उगवण उशिराने झाली. पाऊस नसल्याने भाताच्या व नाचणीच्या लावण्या रखडल्या होत्या. वीसगाव व आंबवडे खोऱ्यातही मागील आठवड्यात भातासह इतर पिकांची पेरणी करण्यात आली. पूर्व भागातील महामार्गावरील गावे आणि भोंगवली परिसरात पाऊसच नसल्याने पेरण्या रखडल्या होत्या. पाऊस पडला तरच पेरण्या होतील; अन्यथा शेतकऱ्यांनी शेतात केलेली मशागत वाया जाणार, अशी परिस्थिती होती. मात्र, दोन दिवस झालेल्या पावसामुळे भाताच्या पिकांना जीवदान मिळाले असून, बाजरी, सोयाबीन, ज्वारी, भुईमूग या पिकांच्या पेरण्यांना जोर आला आहे. शेतकरी कामात व्यस्त झाला आहे. (वार्ताहर)>धरणक्षेत्रात १४५ मी.मि. पावसाची नोंदभाटघर धरणभागात आज ४३ तर एकूण १४५ मिमी पाऊस झाला. धरण १० टक्के भरले आहे. मागील वर्षी या वेळी भाटघर धरणभागात २९१ मिमी पाऊस होऊन धरण ३० टक्के भरले होते. तर नीरा देवघर धरणभागात आज १०७ मिमी तर एकूण २६९ मिमी पाऊस होऊन धरण ६.४० टक्के भरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत तीनपट पाऊस कमी असून धरणातही पाणीसाठा तिप्पट कमी आहे. मात्र, दमदार पावसामुळे भातासह इतर पिकांसाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता होती. पाऊस झाल्याने भातासह इतर पिकांना फायदा होणार आहे.पाऊस पडला नसता तर भातासह सर्व पिकांवर परिणाम झाला असता. मात्र मागील दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील भाताच्या पिकांना फायदा होणार असून, पुढील आठवड्यात पश्चिम भागात भाताच्या लावण्या सुरू होतील, तर पूर्व भागातील शेतकरी खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी पावसाचा चांगला उपयोग होणार आहे.- सूर्यकांत वडखेलकर, कृषी अधिकारी
पावसाची संततधार; पेरण्यांना सुरुवात
By admin | Updated: July 4, 2016 01:31 IST