मुंबई : पावसाळ्यात कोकण रेल्वेला नैसर्गिक आपत्तींचा नेहमीच सामना करावा लागतो. प्रत्येक वर्षी कोकण रेल्वेकडून आपल्या मार्गावर पावसाळापूर्व उपाययोजना केल्या जातात. या उपाययोजनांची पाहणी मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून पुढील आठवड्यात दोन दिवस केली जाणार आहे. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे कोकण रेल्वेमार्गावर प्रत्येक वर्षी दरड कोसळणे, माती खचण्याच्या घटना घडतात आणि त्याचा कोकण रेल्वेला मोठा फटका बसतो. या घटना घडू नयेत यासाठी कोकण रेल्वेमार्गावर सुरक्षेचे उपाय केले जातात. उपाययोजनांवर कोकण रेल्वेने १९९९ ते एप्रिल २०१३पर्यंत एकूण २९२ कोटी ५२ लाख रुपये खर्च केले आहेत. मागील वर्षी कोकण रेल्वेने २३ कोटी रुपये खर्च केले होते; तर यंदा २०१४मध्ये जवळपास १७ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याने १९९९पासून आतापर्यंत करण्यात आलेला खर्च हा ३०० कोटींपेक्षा जास्त झाला आहे. कोकण रेल्वेकडून सर्वाधिक लक्ष हे पोमेंडी, निवसर, अडवली या ठिकाणांवर दिले जाते. कोकण रेल्वेकडून नेमक्या उपाययोजना कशा केल्या आहेत, याची पाहणी मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी करणार आहेत. पुढील आठवड्यात मंगळवार आणि बुधवारी दोन दिवस पाहणी करणार असून, त्यानंतर आपला अहवाल कोकण रेल्वेला सादर करतील. (प्रतिनिधी)
रेल्वे सुरक्षा आयुक्त करणार कोकण रेल्वेमार्गाची पाहणी
By admin | Updated: June 14, 2014 04:45 IST