अमोल जायभाये, पिंपरी‘एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास’ हे वाक्य नियमित आपल्या कानी पडते. मात्र पुणे विभागात ९ महिन्यांत एसटीचे तब्बल ११८ अपघात घडले आहेत. त्यामुळे एसटीचा प्रवास सुरक्षित कसा, हा प्रश्न उपस्थित होत आहे. या अपघातात मनुष्यहानीबरोबरच एसटीचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले़ हे वाढते अपघात रोखण्यासाठी महामंडळाला तातडीने उपाययोजना आखाव्या लागणार आहेत. पुणे विभागात १ जानेवारी ते ९ आॅक्टोबर या कालावधीत ११८ अपघात घडले आहेत. यात २७ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर २२१ जखमी झाले आहेत. ‘गाव तिथे एसटी’ आहे. तिच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनांचा अजूनही अभाव आहे. बसस्थानकांवर मोठ्या प्रमाणात पाकीटमारी होते. प्रवाशांच्या सेवेशी एकनिष्ठ असणाऱ्या एसटीला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या उपाययोजना करता आल्या नाहीत हे वास्तव नाकारता येणार नाही़ एसटीला नफ्यात आणण्यासाठी उपाययोजना सुरू असतात. प्रवासी दिन, प्रवासात सवलत अशा योजना आखूनही एसटी तोट्यात चालत आहे. ग्रामीण भागात खिळखिळ्या बस धावत आहेत. रस्त्यातच एसटी बंद पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. तुटलेल्या-फाटलेल्या सीट, काचा नसलेल्या खिडक्या हे नेहमीचेच आहे. अनेक अपघात हे टायर फुटल्याने किंवा स्टिअरिंग फेल झाल्यानेही घडले आहेत. अनेकदा चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडतात. चालक, वाहकाची पदे रिक्त आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे नियमित काम करावे लागणे किंवा जास्त वेळ गाडी चालवल्यामुळे, चालकाची झोप होत नसल्यानेही अपघात घडल्याची उदाहरणे आहेत़ चालकांना सुट्या मिळत नासल्याने त्यांना पुरेसा आराम मिळत नाही. त्यांची मानसिक अवस्था वाहन चालवण्यासाठी सुयोग्य नसते. त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी होते का, पुरेसे वेतन आहे का, या सर्व गोष्टी पाहणेही गरजेचे आहे.
एसटीच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह
By admin | Updated: October 27, 2014 02:09 IST