कोल्हापूर : अरबी समुद्रातील भव्य शिवस्मारकाच्या उभारणीमध्येही आपलाही वाटा आहे, अशी भावना निर्माण होण्यासाठी जनतेतून निधी संकलन करण्याचा विचार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे सांगितले. पाटील म्हणाले, गावागावांतून या स्मारकासाठी नद्यांचे पाणी आणि गड-किल्ल्यांवरील माती आणली गेली. ती एवढ्यासाठीच की आपलाही या भूमिपूजनामध्ये सहभाग आहे, अशी भावना निर्माण व्हावी. या स्मारकासाठी ३,४०० कोटी रुपये खर्च येणार आहे. स्मारक उभारणीमध्ये आपलाही खारीचा वाटा आहे, अशी भावना असलेल्या जनतेतूनही निधी संकलन करण्यात येईल. मात्र, ते मुख्यमंत्री निधीमध्ये जमा करायचे की कसे याबाबत अजून काही निश्चित ठरवलेले नाही. तीन वर्षांत स्मारकाचे काम पूर्ण करायचे आहे. त्यासाठी शासन निधी कमी पडून देणार नाही, हे वास्तव आहे. परंतु उत्स्फूर्तपणे देणगी देण्याची इच्छा असलेल्यांसाठी ही योजना पुढे आल्याचे मानले जाते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
‘शिवस्मारकासाठी जनतेतून निधी’
By admin | Updated: December 26, 2016 04:12 IST