नागपूर : संपूर्ण देशाला हादरविणाऱ्या दादरी येथील धर्मांधांनी केलेल्या हत्येचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कडक शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी संघाकडून करण्यात आली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, गोहत्या प्रकरणातील वादग्रस्त लेखामुळे वादात भर टाकणारे ‘पांचजन्य’ साप्ताहिक हे आपले मुखपत्रच नसल्याचा दावा संघातर्फे करण्यात आला आहे.दादरी येथे गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून मोहम्मद इकलाख या व्यक्तीची हत्या झाली व देशात एका नव्या वादाला तोंड फुटले. त्यातच ‘गोहत्या करणे हे पाप आहे आणि असे पाप करणाऱ्यांची हत्याच केली पाहिजे,’ असे वेदांमध्ये सांगण्यात आले असल्याचे नमूद करून ‘पांचजन्य’ या संघाच्या मुखपत्राने या वादात आणखी भर घातली. परंतु हा लेख प्रसिद्ध होताच संघावर सर्व स्तरांतून टीका होऊ लागली. त्यानंतर लगेच संघाने सारवासारव करण्याची भूमिका घेतली.दादरी घटनेला संघाचे समर्थन होते, हे सर्व दावे कपोलकल्पित आहेत. संघाने हिंसेचे समर्थन केलेले नाही. चौकशी व्हायला हवी व दोषींना कडक शिक्षा व्हायला हवी, अशी संघाची भूमिका असल्याचे मत संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले आहे. शिवाय ‘पांचजन्य’ व ‘आॅर्गनायझर’ ही साप्ताहिके संघाची मुखपत्रे नाहीत. संघाचे अधिकृत पदाधिकारीच संघाकडून भाष्य करतात, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
दादरीचा संघाकडून निषेध
By admin | Updated: October 20, 2015 00:20 IST