सूर्यकांत वाघमारे,नवी मुंबई- खासगी वाहनचालकांच्या मनमानी कारभारामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांना वाहनतळाचे स्वरूप आले आहे. चालकांकडून रस्त्यालगतच वाहने उभी केली जात असल्यामुळे वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे. याशिवाय अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. वाहतूक पोलिसांसह संबंधित प्रशासनाने याकडे डोळेझाक केल्यामुळे अवैध पार्किंगमागे अर्थकारण दडल्याची शक्यता वर्तवण्यता येत आहे.शहरातील प्रमुख रस्त्यांलगत होणाऱ्या अवैध पार्किंगमुळे भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. वाशीतील अरेंजा चौक ते तुर्भे मार्गावर रस्त्यालगत मोठ्या संख्येने अवजड वाहने उभी केली जात आहेत. त्यामध्ये ज्वलनशील पदार्थ असलेल्या टँकरसह इतरही खासगी वाहनांचा समावेश आहे. त्याच ठिकाणी काहींनी बेकायदेशीर गॅरेजची दुकानेदेखील थाटली आहेत. याचा फटका वाशी-तुर्भे मार्गावरील रहदारीला बसत असून त्याठिकाणी गंभीर दुर्घटनेचीदेखील शक्यता निर्माण झाली आहे. अवैध वाहनतळापासून काही अंतरावरच पेट्रोलपंप आहे. त्यामुळे रस्त्यालगतच्या उभ्या रासायनिक टँकरला दुसऱ्या वाहनाची धडक बसून आग लागल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. असे असतानाही वाहतूक पोलिसांकडून रस्त्यालगतची ही अवैध पार्किंग हटवली जात नसल्याचा संताप वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे. असाच प्रकार एपीएमसी आवारातील इतरही प्रमुख रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. माथाडी भवन चौक ते कोपरीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा ट्रक, कंटेनर उभे असतात. चालकांकडून त्याच ठिकाणी स्टोव्हवर स्वयंपाकदेखील केला जातो. या प्रकारामुळे त्या ठिकाणी आगीची घटनादेखील घडू शकते. रस्त्यालगत उभ्या वाहनांमुळे गुन्हेगारी घटनांना बढावा मिळत आहे. यापूर्वी एपीएमसी व सीबीडी परिसरात हत्या व बलात्कार यासारख्या गंभीर घटनादेखील घडल्या आहेत, तर वाहनचोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. यानंतरही अवैध वाहनतळांचे गांभीर्य वाहतूक पोलीस व संबंधित प्रशासन घेत नसल्याचे दिसत आहे. कोपरी येथील पुलालगतदेखील खासगी बसचे वाहनतळ तयार झाले आहे. औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांच्या कामगारांची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बस रहिवासी क्षेत्रात उभ्या केल्या जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या ठिकाणी अनेकदा नाकाबंदी असते. मात्र, रस्त्यालगतच्या वाहनांवर कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे.>प्रमुख रस्त्यांवर पार्किंगघणसोली गावाच्या प्रवेशमार्गावरच केमिकलचे टँकर उभे करून वाहनचालकांकडून अगोदरच अरुंद असलेला रस्ता बळकावला जात आहे. तर सीबीडी स्थानकाबाहेर खासगी बसचे बेकायदेशीर वाहनतळ तयार झाले आहे. परिसरातीलच काही खासगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या बस त्या ठिकाणी रस्त्यालगत उभ्या केल्या जात आहेत; परंतु दोन लेनमध्ये पार्किंग होत असल्याने त्या ठिकाणी किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत. पुलालगत अथवा पुलाखाली वाहन पार्किंग केल्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास पुलाला धोका होऊ शकतो. अनेक ठिकाणी पोलिसांनी जप्त केलेली गुन्ह्यातली वाहने ठेवण्यासाठीही पुलालगतच्या मोकळ्या जागेचा वापर केला जातो. >अधिकृत पार्किंग ओसपालिकेने अनेक ठिकाणी वाहनतळ बांधूनही ते ओस पडत आहेत, तर वाहनतळापासून काही अंतरावरच सर्रासपणे रस्त्यालगत वाहने उभी केली जात आहेत. रस्त्यावर वाहने उभी करण्यास मनाई असतानाही, नियमांची पायमल्ली केली जाते.दुकाने व मार्केट परिसर तसेच मॉललगतच्या रस्त्यांवर बेकायदेशीर वाहन पार्किंग होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक मॉल चौकालगत असल्यामुळे मॉल परिसरातील वाहतूककोंडी झालेली पाहायला मिळते. यावरही कारवाईची गरज नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे.
प्रमुख रस्त्यांवर खासगी वाहनांचा तळ
By admin | Updated: March 6, 2017 02:47 IST