पुणे : साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा काही तासांवर आला असतानाही संमेलनाध्यक्षांचे भाषण उपलब्ध झालेले नाही. ‘संमेलनाध्यक्षांचे भाषण मिळेल का हो भाषण?’ अशी विचारणा साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती; मात्र महामंडळाचे एकच ठरलेले उत्तर ऐकायला मिळत होते, ‘भाषण छपाईसाठी गेले आहे !’. साहित्य महामंडळाकडून दरवर्षी संमेलनाध्यक्षांचे लिखित भाषण प्रसारमाध्यमांना तीन दिवस अगोदरच दिले जाते. यावर्षी अद्याप छपाईच झालेली नसल्याने ते माध्यमांना अद्यापही उपलब्ध होऊ शकलेले नाही. महामंडळाचे प्रमुख कार्यवाह हे अध्यक्षीय भाषणाच्या पुस्तिकेचे प्रकाशक-मुद्रक असतात. अध्यक्षांकडून भाषणाची प्रत मिळाल्यानंतर साहित्य महामंडळाकडून त्या पुस्तिकेचे वाचन होऊन; मगच ते छपाईसाठी दिले जाते. मात्र, यंदा संमेलनाध्यक्षांनी तीन दिवसांपूर्वी त्यांचे १३५ पानी भाषण तयार झाले. ते गुरुवारी रात्री ८ वाजता महामंडळाकडे भाषण सुपूर्त करणार होते; मात्र ते उपलब्ध झाले नसल्याचे महामंडळाचे पदाधिकारी सांगतात.यामुळे संंमेलनाध्यक्षांचे भाषण वेळेत देण्याच्या प्रथेमध्ये यंदा खंड पडला आहे. मी उत्स्फूर्त भाषण करणार असल्याचे नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी जाहीर केले. मात्र भाषणाची पुस्तिका केवळ महामंडळाच्याच संग्रही राहणार असल्याची चर्चा आहे.
अध्यक्षीय भाषण छपाईखान्यातच?
By admin | Updated: January 16, 2016 03:04 IST