रामचंद्र चिंतामण ढेरे यांचा जन्म २१ जुलै १९३० रोजी पुण्याजवळील निगडे या छोट्याशा गावी झाला. महापालिका शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पूना इंग्लिश स्कूल आणि पूना नाईट स्कूलमध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. १९६६ मध्ये त्यांनी पदवी संपादन केली. दरम्यान हायस्कूलच्या काळात मुद्रितशोधक म्हणून ते एका स्थानिक वृत्तपत्रात काम करीत होते. १९७५ मध्ये त्यांनी पीएच.डी. मिळविली आणि १९८० मध्ये पुणे विद्यापीठाने साहित्यातील डी.लिट्. ही पदवी देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. डेक्कन कॉलेजकडूनही त्यांना २००४ साली डी.लिट्. देण्यात आली. १९५५ पासूनच ते संत साहित्य, लोककला, देवदेवता, लोकसाहित्य आदी विविध विषयांवर लेखन करीत होते. लेखनाबरोबरच वक्तृत्व शैलीचे वरदान त्यांनी लाभले होते. अनेक सार्वजनिक व्याख्यानमालेमध्ये ते भाषण देत असत. परंतु व्याख्यानांचे विलोभन हा सात्विक मोह आहे, संशोधन कार्यात तो अडसर आहे, या जाणिवेतून त्यांनी आपले लक्ष लेखनावर केंद्रित केले. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीच्या अभ्यासाचा परीघ हा दक्षिणेच्या संस्कृतीशी आणि अभ्यासाशी निगडित आहे, याची जाणीव झाल्याने त्यांनी भारतीय संस्कृतीच्या इतिहासाची परिमाण संशोधनाच्या माध्यमातून तपासण्याच्या दिशेने लेखनप्रवास वळवला. ‘लज्जागौरी’ मधून दैवशास्त्रीय अभ्यास त्यांनी मांडला, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश यामधील देवीदेवतांच्या स्वरूपांचा, रूपकांची मांडणी या पुस्तकातून समोर येते. इतिहासाच्या पाळामुळांशी जाताना अनेक नवीन गोष्टी त्यांनी लेखनाच्या माध्यमातून उजागर केल्या. त्यांच्या संशोधन पद्धतीमध्ये इतिहास आणि सांस्कृतिक अभ्यास यांचा सांगोपांग विचार आढळतो. त्यांच्या अनेक संशोधनपर लेखांवर आक्षेप घेण्यात आले. मात्र त्यांनी कधीही आपले लेखन मागे घेतले नाही.>ग्रंथसंपदा : प्राचीन मराठीच्या नवधारा, रामराज्याची स्फूर्तीकेंद्रे, दत्त संप्रदायाचा इतिहास, शोधशिल्प, भारतीय रंगभूमीच्या शोधात, लोकदेवतांचे विश्व, प्राचीन मराठी वाडमय, खंडोबा, श्री तुळजाभवानी, मुस्लीम मराठी संत कवी, शिखर शिंगणापूर श्री शंभू महादेव.>पुरस्कार : राज्य पुरस्कार १९५९, (दत्त संप्रदायाचा इतिहास, नाथ संप्रदायाचा इतिहास), राज्य पुरस्कार १९६१ (प्रवासी पंडित), राज्य पुरस्कार १९६९ ( मुसलमान मराठी संत कवी), राज्य पुरस्कार १९७१ (श्री नामदेव-एक विजययात्रा), पुणे विद्यापीठ चिपळूणकर पुरस्कार (मुसलमान मराठी संत कवी), साहित्य अकादमी पुरस्कार १९८७ (श्री स्वामी समर्थ धार्मिक), महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गं. ना. जोगळेकर पुरस्कार २०१३ (श्री विठ्ठल : एक महासमन्वय), त्रिदल फाउंडेशनचा पुण्यभूषण पुरस्कार (१४ मार्च २०१०), पुणे महानगरपालिकेचा महर्षी वाल्मिकी पुरस्कार (२०१३), अखिल भारतीय यादव महासंघाचा विशेष पुरस्कार (२९ मार्च २०१५). चिमण्या गणपती मंडळातर्फे लोकसंस्कृतीचे गाढे ‘साहित्य सेवा सन्मान’ प्रदान करण्यात आला. (२६ फेब्रुवारी२०१६).
लोकसंस्कृतीचा गाढा उपासक हरपला...
By admin | Updated: July 2, 2016 04:23 IST