ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ८ - राज्यातील विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने सामूहिक नेतृत्वाखालीच लढवणार असून निवडणुकीनंतर लोकशाहीपद्धतीने निर्वाचीत आमदारांपैकी एकाची नेता म्हणून निवड करु असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराविषयी सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. मी दिल्लीतच आनंदी असून राज्यात परतणार नाही असे विधानही शरद पवार यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा १५ वा वर्धापनदिन सोहळा मुंबईत पार पडला. या मेळाव्यात शरद पवारांनी स्वपक्षीय नेत्यांना फटकारतानाच मुख्यमंत्रीपदाविषयीची भूमिकाही स्पष्ट केली. विधानसभेविषयी शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराविषयी सुरु असलेली चर्चा पुरे झाली. राष्ट्रवादी काँग्रेस सामूहिक नेतृत्वाखालीच निवडणुकीला सामोरे जाणार. जनतेने पुन्हा संधी दिल्यास निर्वाचीत आमदारांपैकी एकाची नेता म्हणून निवड करु असे पवार यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनी मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व नेत्यांनी सुरु केली आहे. याविषयीही पवारांनी भाष्य केले.'मी दिल्लीत आनंदात आहे. आता दिल्लीत सत्तेत नसल्याने मला फिरता येईल. पुन्हा कार्यकर्त्यांशी संवाद साधता येईल. मात्र राज्यात परतणार नाही' असे सांगत त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीविषयी सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला.
लोकसभा निवडणुकीत पराभव झाला म्हणून नाउमेद न होता नव्या जिद्दीने कामाला लागा. जनतेशी संवाद वाढवा. दिल्ली व राज्यात मतदान करताना मतदार वेगळा विचार करतात असे पवार यांनी सांगितले.
दिल्लीत सत्ताबदल होताच अल्पसंख्याक दहशतीखाली
दिल्लीत सत्ताबदल झाल्याने सर्व सत्ता एका विशिष्ट वर्गाच्या हातात गेली आहे. याचे परिणामही आता दिसू लागले आहेत. फेसबुकवर आक्षेपार्ह फोटो टाकून समाजात तेढ करण्याचे प्रकार घडले. यात महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक स्थळांवर, व्यक्तींवर हल्ले झाले. या आक्षेपार्ह फोटोशी काडीमात्र संबंध नसलेल्या एका इंजिनिअर तरुणाचा बळी गेला. समाजातील लहान घटक दहशतीखाली वावरत असेल तर ते चुकीचे आहे असे पवार यांनी सांगितले.
दुरुस्ती करा अन्यथा जनताच दुरुस्ती करेल
नेता व कार्यकर्ता तसेच जनतेमधील अंतर वाढले आहे. लोकसभा निवडणुकीत याचा फटका पक्षाला बसला आहे.आता हे अंतर कमी करुन कार्यकर्ता व जनता दोघांशी सुसंवाद साधा. जनतेशी सुसंवाद साधून विकास करा. आता चुक दुरुस्त करा अन्यता विधानसभेत जनताच आपल्याला दुरुस्त करेल असा इशाराही त्यांनी पक्षातील नेत्यांना दिला.