चार वर्षात १५0 वेळा रुळांना तडा, वेल्डिंग तुटल्याच्या घटनामुंबई : दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला अपघात झाला आणि रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार हळूहळू समोर येण्यास सुरुवात झाली. पनवेल ते रोहापर्यंतचा रेल्वेचा विभाग धोकादायक बनत चालला आहे. या विभागात मागील चार वर्षात तब्बल १५0 पेक्षा जास्त वेळा रेल्वे रुळाला तडा आणि वेल्डिंग तुटल्याच्या घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनांमध्ये लोको पायलट आणि रेल्वे कामगारांच्या सतर्कतेमुळे एक्सप्रेस गाड्या अपघातातून बचावल्या आहेत. दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला नागोठणे ते रोहा दरम्यान अपघात झाला आणि २३ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. तर शेकडो प्रवासी जखमी झाले. रेल्वे रुळाला तडा किंवा वेल्डिंगमध्ये खराबी झाल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. त्याचप्रमाणे या भागात वेग मर्यादा आखून दिलेली असतानाही एका वळणापूर्वी पॅसेंजर ट्रेनचा वेग जास्त ठेवल्यानेही अपघात झाल्याची चर्चा आहे. अशी अनेक कारणे जरी पुढे येत असली तरी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या चौकशीनंतरच ही बाब समोर येईल. महत्वाची बाब म्हणजे पनवेल-रोहा हा मध्य रेल्वेच्या अखत्यारित भाग येतो. मात्र या भागातील रेल्वे रुळांच्या कामांकडे थोडे दुर्लक्षच होत असल्याचे समोर आले आहे. पनवेल-रोहापर्यंतच्या भागात गेल्या चार वर्षात १५0 पेक्षा जास्त वेळा रुळांना तडे आणि रुळांना केलेले वेल्डिंग तुटल्याच्या घटना घडल्याचे खुद्द मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्क्षी यांनी सांगितले. एक्सप्रेस गाड्यांचे लोको पायलट आणि रेल्वे कामगारांच्या सतर्कतेमुळे या घटना निदर्शनास आल्या आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांसह मालगाड्यांचे अपघात होता होता वाचले आहेत. अवघ्या पाच ते सहा अपघात सोडता या विभागादरम्यान एक्सप्रेस किंवा मालगाडीचे डबे घसरण्याचे छोटे अपघातच झाले आहेत. याबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बकक्षी यांनी सांगितले की, ही गंभीर बाब आहे. १५0 पेक्षा जास्त घटना रुळाला तडा आणि वेल्डिंग तुटल्याच्या घटल्या आहेत. ही बाब वेळोवेळी रेल्वेच्या निदर्शनास येऊनही त्याकडे रेल्वेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच दिवा-सावंतवाडीसारख्या पॅसेंजरला अपघाताला सामोरे जावे लागले. आता आणखी काही सूचना मध्य रेल्वेला करण्यात आल्या असून त्यामध्ये वेगाची मर्यादा घालण्याच्या सूचनेचा समावेश आहे.
रेल्वेचा पनवेल-रोहा विभाग धोकादायक
By admin | Updated: May 12, 2014 02:53 IST