रत्नागिरी/चिपळूण : उकाड्याने हैराण झालेल्या जिल्हावासियांना वादळी वार्याच्या साथीने आलेल्या पावसाने चांगलाच दणका दिला. चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. चिपळुणातील चारही वीज उपकेंद्र बंद ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतला. रत्नागिरी, चिपळूणसह देवरूख, दापोली आदी तालुके अंधारात बुडाले आहेत. गेले काही दिवस उकाड्याची तीव्रता वाढली आहे. बुधवारी तर सकाळी थोडा पाऊस पडल्याने उष्म्यात आणखीन भर पडली. सायंकाळी ठिकठिकाणी पावसाला सुरूवात झाली. चिपळूण, देवरूख आणि खेड परिसराला पावसाचा मोठा तडाखा बसला. चिपळुणात दुपारी २.३० वाजता पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पाऊस कोसळत होता. त्यानंतर साडेचार वाजता पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी तर चिपळुणातील धामणदिवी गावी नुकतीच उभारलेली कमान वादळी वार्यामुळे कोसळली. वादळामुळे चिपळूण तालुक्यातील अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले, तर काही ठिकाणी वाहनांवर झाडे पडल्याने नुकसान झाले आहे. शहरातील बाजारपेठेत असलेल्या परकार कॉम्प्लेक्ससमोर झाड पडल्याने काही दुचाकीचे नुकसान झाले. ज्याठिकाणी भाजी विक्रेते बसतात, तेथेही झाड कोसळले. चिपळूण गोवळकोट रोडवर पिकअप शेडवर झाड कोसळल्याने नुकसान झाले आहे. मुरादपूर येथील सनगे यांच्या घरावर झाड पडले, तर खेर्डी येथील मंदिराजवळ विजेचा खांब पडल्याने वाहतूक ठप्प झाली. येथे अनिल दाभोळकर यांच्या घराजवळ झाड कोसळून चार दुचाकींचा अक्षरश: चुराडा झाला. पेढे-कुंभारवाडी येथे दिलीप खैर, शंकर मांडवकर, बळीराम खेडेकर, लक्ष्मण पडवेकर यांच्या घरावर झाडे पडल्याने नुकसान झाले आहे. पेढे येथे निसर्गसानिध्य पर्यटन केंद्राच्या मालकीची नारळी, पोफळीची झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे. याच ठिकाणी भिसे यांच्या घरावरील पत्रे उडाले, तर पेढे हायस्कूलजवळ विजेच्या तारा पडल्याने वाहतूक ठप्प झाली. पेढे धरवेवाडी येथे काही घरांवरील पत्रे उडाले, तर वाणीआळी येथे प्रभाकर कापडी यांच्या घरावर झाड पडून विजेचा खांब वाकला आहे. पाग बौध्द कॉलनीसमोर दीपक हॉटेल येथे झाड पडल्याने विजेचा पोल वाकला आहे. कात्रोली - कुंभारवाडी येथे १३ घरांचे नुकसान झाले आहे, तर गावातील अन्य २२ घरांना किरकोळ फटका बसला आहे. चिपळुणातील डीबीजे कॉलेजसमोर झाड कोसळले असून, सरकारी धान्य गोडाऊनचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. याठिकाणी असणारे धान्य भिजू नये, यासाठी तहसीलदार वृषाली पाटील आणि बांधकाम अभियंता ढेरे यांनी तत्काळ या भागाची पाहणी करून सूचना केल्या. दरम्यान, ठिकठिकाणी झालेल्या पडझडीमुळे महावितरणने चिपळुणातील चारही उपकेंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर हे स्वत: परिस्थितीची पाहणी करत असून, त्यानंतरच वीजपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष रिहाना बिजले यांनीही शहरातील पडझडीची पाहणी केली. दरम्यान, रत्नागिरी शहर आणि परिसरातही वार्यासह जोरदार पाऊस झाला. सायंकाळी पडलेल्या या पावसामुळे कोठेही पडझड झाली नाही. मात्र, हवेत गारवा निर्माण झाला आहे. रत्नागिरीत बुधवारी दिवसभर विजेचा खेळखंडोबा सुरू होता. गुहागर तालुक्यात सायंकाळी ५.३० वाजल्यापासून तब्बल दीड तास वादळी वार्यासह पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत तहसील कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मळण येथील सुनील धामणस्कर यांच्या घरावर झाड पडून घरामधील महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे. आंबेरेखुर्द येथील गणपत बाळू अवेरे यांच्या गोठ्यावर वीज पडून बैल दगावला आहे. सुरळ येथील मोहिते यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे. तलाठ्यांना सर्व नुकसानाचे तातडीने पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तालुक्यात काही ठिकाणी वीज खांब उन्मळून पडल्याने वीजपुवठा खंडित झाला आहे. शृृंगारतळी परिसरातही काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. शाहीन फिरोज बोट यांच्या घरावरचे छप्पर उडून गेल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, वादळी वार्यासह पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी कलमांच्या झाडाखाली हापूस आंब्याचा मोठा खच पडलेला दिसून येत होता. (प्रतिनिधी)
बाहेर पाऊस अन् घरात अंधार!
By admin | Updated: May 8, 2014 12:47 IST