मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) नव्या आर्थिक वर्षातील ३ हजार ८३२.३० कोटीच्या अर्थसंकल्प गुरुवारी मंजूर करण्यात आला आहे. मुंबईतील नागरी परिवहन प्रकल्पासाठी सर्वाधिक एक हजार ५ कोटींची तरतूद करण्यात आलेली असून पूर्णपणे तोट्यात चाललेल्या मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी ४०२.६० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. भाजपाशिवाय सर्व राजकीय पक्ष व मुंबईकरांचा विरोध वाढत असलेल्या मेट्रो-३ साठी १८० कोटींची तरतूद केलेली आहे.मुख्यमंत्री व प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत २०१५-१६ या वर्षातील अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यामध्ये छेडानगरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी दोन उड्डाणपूल व एक उन्नत मार्ग बांधण्याची परवानगी देण्यात आली आहे.मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-१ व प्रकल्प-२ च्या अंतर्गत छत्रपती शिवाजी टर्मिनस व कुर्ला दरम्यान पाचवा, सहावा रेल्वे मार्ग, मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान ६वा, हार्बर मार्गावर अंधेरीपासून गोरेगावपर्यंतचे विस्तारीकरण, डीसीचे एसीमध्ये रुपांतर, आधुनिक पद्धतीच्या ईएमयुचे उत्पादन, त्याची देखभाल व स्टेबलिंग, तांत्रिक सहाय्य व स्थानक सुधारणा करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी १००५ कोटीची तरतूद आहे. अर्नाळा-विरार-शिरसाड, अंबाडी-वाशिंद हा राष्ट्रीय महामार्ग क्र.८, कल्याण-बदलापूर-कर्जत-हलफाटा रा.मा.क्रं.३५, कर्जत ते हाळफाटा रा.मा.क्र.३८, कटाई-नाका-बदलापूर रा.मा.क्र.४३ यांचे रुंदीकरण आणि सुधारणा केल्या जातील. त्याचप्रमाणे रिंगरोड, शिरगाव व बदलापूरला जोडणारा रस्ता, नेरळ-दस्तूरी मार्ग, आणि सौंदर्यीकरण व माथेरान येथील स्थळाचा विकास केला जाईल.प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीने शिफारस केलेल्या वसई-पश्चिम आणि भाईदरला जोडणाऱ्या ३+३ मार्गिकेच्या ५ किलोमीटर लांबीच्या खाडीच्या पूलाला मान्यता दिली आहे. त्यासाठी अंदाजे ८७५.५४ कोटीची तरतूद केली आहे. मोनो-२ चे काम अंतिम टप्प्यात असून पुढील वर्षापर्यत पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली असून याकामासाठी ४०२.६० कोटीची तरतूद केली आहे. मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी प्राधिकरणातर्फे १६१.४७ कोटीची तरतूद असून त्यामध्ये खेरवाडी उड्डाणपूलाची उत्तरेकडील बाजू, बीकेसीतील ‘जी’ ब्लॉकपासून चुनाभट्टीपर्यतचा उन्नत माग आणि अंधेरी-घाटकोपर जोडरस्ता ही कामे मार्गी लावली जाणार आहेत. आजच्या बैठकीला महानगर आयुक्त यु.पी.एस.मदान, अतिरिक्त महानगर आयुक्त संजय सेठी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)च्मेट्रो-३चे आरेतील कारडेपो आणि गिरगावातील नियोजित भुयारी मार्गाबाबत मुंबईकरांचा विरोध वाढत चालला असून भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्षांनी त्यात उडी घेतली आहे. च्कुलाबा-वांद्रे-सीफ्झ मार्गावरील भूयारी मार्गाच्या या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी मात्र पूर्णपणे पाठराखण केली आहे. ते म्हणाले,‘ शहर व महानगरात सहज व सुलभ प्रवासासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून या वर्षात त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १८० कोटीची तरतूद केली आहे. ’
नागरी परिवहनसाठी एक हजार कोटी
By admin | Updated: March 27, 2015 01:27 IST