गडकरी यांची स्पष्टोक्ती : दिल्लीत खूश नागपूर : दिल्लीत मी खूश आहे, महाराष्ट्रात परतणार नाही, असे स्पष्ट करीत भाजपाचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गोपीनाथ मुंडेनंतर महाराष्ट्रात कोण, या चर्चेला पूर्णविराम लावला. गडकरी यांनी येथील पत्रकारांशी रविवारी संवाद साधला. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे राज्यात भाजपामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाल्यास तुम्ही महाराष्ट्रात परत येणार का, असा प्रश्न त्यांना विचारला असता, त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. ते म्हणाले, माझी अगोदर दिल्लीत जाण्याची इच्छाच नव्हती. परंतु आता दिल्लीत गेलो आहे. त्यामुळे तेथून पुन्हा महाराष्ट्रात परत येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेस नेते दत्ता मेघे यांच्या भाजपा प्रवेशासंबंधीच्या प्रश्नावर सावध पवित्रा घेत यासंबंधी मेघे यांनाच विचारणे योग्य राहील, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा कायम स्वतंत्र विदर्भाला भाजपाचा नेहमीच पाठिंबा राहिला असून, तो आजही कायम आहे. मात्र त्यासाठी संसदेत प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. निवडणूक काळात वेगळ्या विदर्भाबाबत मी दिलेल्या आश्वासनावर आजही ठाम असून, त्यावर कुणीही शंका घेण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात परतणार नाही
By admin | Updated: June 9, 2014 01:16 IST