नागपूर : अपारंपरिक ऊर्जास्रोत व सौरऊर्जे संदर्भात शासन नवीन धोरण आखत आहे. १५ जानेवारीपर्यंत ते ठरविण्यात येईल आणि सर्व प्रकिया पूर्ण करून २८ फेब्रुवारीपर्यंत नवीन धोरण सादर केले जाईल, अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. विजय वडेट्टीवार, गोपालदास अग्रवाल आदींनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, यापूर्वी कृषी पंपासाठी अवैधरीत्या वीज कनेक्श्न घेतल्याचे आढळून आले तर वीज वितरण कंपनीतर्फे संबंधित वायर ताब्यात घेतला जायचा. दंड आकारला जायचा व प्रसंगी पोलीस कारवाईदेखील केली जात होती. यामुळे शेतकऱ्यांना अधिक त्रास व्हायचा. यापुढे हे सर्व प्रकार बंद केले जातील. अवैध कनेक्श्न आढळताच कनेक्श्न व मीटर देण्याचे शुल्क आकारून स्पॉटवरच ते नियमित केले जाईल. कुठलाही दंड आकारला जाणार नाही, असेही बावनकुळे यांनी जाहीर केले. तसेच ट्रान्सफॉर्मर जळाल्याची तक्रार मिळाल्यावर तीन दिवसाच्या आता ते बदलले जाईल व प्रत्येक ट्रान्सफॉर्मरच्या ठिकाणी अग्निशमन यंत्र लावले जाईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अपारंपरिक ऊर्जेचे धोरण २८ फेब्रुवारीपूर्वी
By admin | Updated: December 20, 2014 01:50 IST