मुख्यमंत्री फडणवीस यांचे शिवसेनेला चोख प्रत्युत्तर
नागपूर : मुंबई काल महाराष्ट्रात होती, आज आहे आणि उद्याही राहील. कोणाचे पूज्य पिताश्री आले तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाहीत आणि आम्ही ते होऊ देणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी शिवसेनेचे नाव न घेता विधानसभेत प्रत्युत्तर दिले.मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. त्यावरून शिवसेनेच्या मुखपत्रातून बरीच टीका झाली. शिवाय विरोधकांनीही हा मुद्दा उचलून धरीत सरकारला धारेवर धरले होते. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईविषयी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडलेल्या भूमिकेवरून गहजब निर्माण केला जात आहे. छगन भुजबळ यांच्यासारखे ज्येष्ठ नेते त्याबाबत बोलत आहेत, याचे मला आश्चर्य वाटते. मुंबई महापालिका वा एमएमआरडीएच्या अधिकारांत हस्तक्षेप करण्याचा शासनाचा कुठलाही उद्देश नाही.