मुंबई : पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमधील पाकिस्तानचे सामने महाराष्ट्रात होवू देण्यास सरकारने असमर्थता दर्शविली असल्याने पाकिस्तानसाठी महाराष्ट्राची दारे बंदच राहणार असल्याचं कळते आहे. शिवसेनेच्या भीतीनं त्यांचे सामने महाराष्ट्रात होणार नसल्याचं कळतं. मुंबई आणि नागपूरमध्ये पाकचे सामने झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा अभिप्राय राज्य सरकारनं दिल्यानंतर बीसीसीआयनं पाकिस्तानी संघासाठी महाराष्ट्राची दारं बंदच करून टाकली आहेत. २०१६ सालच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. ही स्पर्धा ११ मार्च ते ३ एप्रिल २०१६ दरम्यान होणार आहे. या स्पर्धेचे सामने बेंगळुरू, चेन्नई, धर्मशाळा, मोहाली, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली आणि कोलकाता या आठ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. ज्या-ज्या ठिकाणी सामने होणार आहेत, तिथल्या सरकारशी बीसीसीआयचे पदाधिकारी सल्लामसलत करीत आहेत. तेव्हा, पाकचा सामना मुंबई किंवा नागपुरात शक्यतो ठेवू नका, अशी सूचना राज्य सरकारने केल्याचे समजते. (वृत्तसंस्था)
पाकला महाराष्ट्रात ‘नो एंट्री’
By admin | Updated: August 11, 2015 00:35 IST