शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

..अन झाले ‘कालिदास’चे नामकरण!

By admin | Updated: July 5, 2016 13:06 IST

‘मेघदूत’सारखे अजरामर महाकाव्य लिहिणाऱ्या महाकवी कालिदासांच्या स्मृतींना आषाढाच्या पहिल्या दिवशी सर्वत्र उजाळा दिला जात असला, तरी नाशिकमध्ये मात्र खास महापालिकेच्या वतीने कालिदास दिन साजरा केला जातो

सुदीप गुजराथी
ऑनलाइन लोकमत, नाशिक : 
‘मेघदूत’सारखे अजरामर महाकाव्य लिहिणाऱ्या महाकवी कालिदासांच्या स्मृतींना आषाढाच्या पहिल्या दिवशी सर्वत्र उजाळा दिला जात असला, तरी नाशिकमध्ये मात्र खास महापालिकेच्या वतीने कालिदास दिन साजरा केला जातो. त्याला कारणीभूत आहे ती महाकवी कालिदास कलामंदिर ही वास्तू... कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी या वास्तूला स्वत:चे नाव देणे नाकारून कालिदासांच्या स्मृती जपल्याने नाशिकमध्ये दरवर्षी हा योग जुळून येतो. 
नाशिकमध्ये शालिमार परिसरात महापालिकेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिर ही वास्तू उभारण्यात आली. तत्पूर्वी, सन १९५५-५६ मध्ये याच ठिकाणी तत्कालीन नगरपालिकेच्या वतीने खुले नाट्यगृह बांधण्यात आले. ते काही वर्षे व्यवस्थित चालल्यानंतर पुढे त्याची रया गेली व बंद पडले. डॉ. वसंतराव गुप्ते यांच्यासह काही लोकप्रतिनिधी व रंगकर्मींनी या जागेवर नाट्यगृह उभारण्याचा प्रस्ताव मांडला; मात्र सन १९८२ मध्ये महापालिका अस्तित्वात आल्यानंतर या कामाला गती आली. या वास्तूचे भूमिपूजन महापालिकेचे प्रथम प्रशासक सुधाकर जोशी यांच्या हस्ते झाले, तर रत्नाकर कुलकर्णी यांच्या कारकीर्दीत ते बांधून पूर्ण झाले. त्याच्या बांधकामासाठी १७५ लाख रुपये खर्च आला. गुढीपाडव्याला दि. ३० मार्च १९८७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत या नाट्यमंदिराचे उद्घाटन झाले. 
दरम्यान, या वास्तूच्या देखरेखीसाठी एक समिती नियुक्त करण्यात आली होती. त्यात कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, शंकरराव अंधृटकर, हेमंत टकले आदिंचा समावेश होता. तर मधुकर झेंडे हे कलामंदिराचे प्रथम व्यवस्थापक होते. या वास्तूला कोणाचे नाव द्यावे, याविषयी विचारविनिमय सुरू झाला व कुसुमाग्रजांच्या नावावर शिक्कामोर्तबही झाले. कुसुमाग्रजांसारखा प्रतिभावंत कवी व साहित्यिक शहरात असताना, अन्य दुसºया कोणाच्या नावाचा विचारही करण्याची गरज नव्हती; मात्र हा प्रस्ताव ऐकल्यावर तात्यासाहेबांनी तो मोठ्या खुबीने नाकारला. ‘आपण हयात असताना एखाद्या वास्तूला आपले नाव देणे योग्य वाटत नाही. पुढे कोणी कोठे ना कोठे आपले नाव देईलच’, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यावर अन्य मान्यवरांनी आपले नाही, तर किमान आपल्या नाटकाचे- ‘नटसम्राट’चे नाव देण्याला तरी मान्यता द्यावी, अशी विनंती केली; मात्र तात्यासाहेबांनी त्यालाही नकार देत महाकवी कालिदासांचे नाव देण्याचा पर्याय सुचवला. त्यामुळे त्यांच्या नावासाठी आग्रही असलेल्या अनेकांचा हिरमोड झाला. कालिदासांसारख्या महान कवीचे नाव देशात अन्यत्र कोठेही दिले जाईल; पण कुसुमाग्रजांचे नाव नाशिकशिवाय अन्य कोठे दिले जाणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला; मात्र कुसुमाग्रजांनी त्याला बगल देत अत्यंत विनम्रतेने आपल्या नावाच्या प्रस्तावाला नकार कायम ठेवला व अखेर या वास्तूचे ‘महाकवी कालिदास कलामंदिर’ असे नामकरण करण्यात आले.  
दरम्यान, कालिदासांच्या नावाचे कोंदण लाभल्याने आजही दरवर्षी आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदास दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने खास कार्यक्रम आयोजित केला जातो व त्यातून कालिदासांच्या स्मृतीला उजाळा मिळतो. नाट्य परिषद व अन्य संस्थांच्या वतीने नाट्यप्रयोग, काव्यवाचन, नृत्य आदि कार्यक्रम सादर केले जातात. याशिवाय शहरात अन्य संस्थांच्या वतीनेही कालिदास दिनानिमित्त गायन-वादनासह विविध उपक्रम आयोजित केले जातात.  यानिमित्त कवी कालिदासांचे स्मरण होते. अन्य शहरांत हा दिवस केवळ शाळा-महाविद्यालयांपुरताच मर्यादित राहतो. नाशकात मात्र तात्यासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे महाकवी कालिदास हे येथील सांस्कृतिक क्षेत्रात स्थान कायम ठेवून आहेत.
 
‘ते’ शिल्प पडद्याआड
महाकवी कालिदास लिखित ‘शाकुंतल’ नाटकातील दुष्यंत-शकुंतला या पात्रांचे शिल्प महाकवी कालिदास कलामंदिराच्या समोर असलेल्या विस्तीर्ण पिंपळाच्या झाडाखाली साकारण्यात आले होते. प्रख्यात शिल्पकार मदन गर्गे यांनी ते तयार केले होते; मात्र तीन ते साडेतीन वर्षांपूर्वी हे पिंपळाचे झाड कोसळल्याने त्याखालचे शिल्पही उद्ध्वस्त झाले. त्याची पुनर्उभारणी केली जाणार होती; मात्र त्याला अद्याप मुहूर्त लागू शकलेला नाही.