मुंबई : रिक्षा-टॅक्सींच्या मूळ भाड्यात १ रुपयाने वाढ करण्याचा निर्णय एमएमआरटीएने नुकताच घेतला. या भाडेवाढीबरोबरच रिक्षा-टॅक्सींचा रात्री १२नंतरचा प्रवासही महागणार आहे. रात्री १२ वाजल्यापासूनच्या सुरुवातीच्या प्रवासात २ रुपयांनी वाढ होत असल्याचे आरटीओतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. रिक्षा-टॅक्सींची भाडेवाढ निश्चित करण्यासाठी परिवहन विभागाकडून हकिम समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या सूत्रानुसार, दरवर्षीच्या मे महिन्यात नवीन भाडे निश्चित केले जाते. वाढत्या महागाईचा दर पाहून आणि सूत्र वापरून ही भाडेवाढ केली जात असून, यंदा १ जूनपासून रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात एक रुपया वाढ करण्याचा निर्णय एमएमआरटीएने घेतला आहे. त्यानुसार रिक्षाचे भाडे १७ वरून १८ रुपये आणि टॅक्सीचे भाडे २१ रुपयांवरून २२ रुपये होणार आहे. या मूळ भाड्यात वाढ होत असतानाच रात्री १२नंतरच्या प्रवासातही चांगलीच वाढ होत असल्याचे आरटीओतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. रात्री १२ ते पहाटे ५ या प्रवास कालावधीसाठी भाड्याच्या २५ टक्के एवढे अतिरिक्त भाडे देय आहे. ते ३0 टक्के एवढे करण्यात यावे, अशी शिफारसही हकिम समितीकडून करण्यात आली आहे. मात्र शासनाकडून रात्रीच्या प्रवासावर २५ टक्के अतिरिक्त भाडे आकारण्याची मान्यता देण्यात आल्याने आतापर्यंत हीच आकारणी होत आहे. हे पाहता यंदा १ जूनपासून होणाऱ्या भाडेवाढीत रात्री १२नंतरचा सुरुवातीचा प्रवास २ रुपयांनी महागणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या रात्री १२ ते पहाटे ५ या कालावधीत सुरुवातीचे रिक्षाचे भाडे २१ रुपये आहे. हे भाडे २३ रुपये एवढे होईल. तर टॅक्सीचे भाडे २६ रुपये असून, ते २८ रुपये होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
रात्रीचा प्रवास दोन रुपयांनी महागणार
By admin | Updated: May 15, 2015 05:13 IST