बोटा (अहमदनगर) : जातीअंताकडून राष्ट्रवादाकडे वाटचाल करताना पुरोगामी, प्रगतशील तसेच राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी व वारसा जपणाऱ्या घटकांनी एकत्र येणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.संगमनेर तालुक्यातील घारगावजवळील कुरकुंडी येथे लोकपंचायतच्या सभागृहात अहमदनगर जिल्हा जातीय अत्याचार विरोधी संघर्ष समितीने आयोजित केलेल्या दोनदिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते म्हणाले, संतांच्या सामूहिकतेच्या विचारसरणीमुळे आज भारतात लोकशाही व्यवस्था टिकून आहे. मात्र, वैदिक विचारसरणी ही चातुर्वर्णीय व्यवस्थेची पुरस्कर्ती आहे. ती संपवण्यासाठी आता पुढाकार घेणे गरजेचे आहे. सत्ताधाऱ्यांची विचारसरणी जातीव्यवस्थेला खतपाणी घालणारी आहे. त्यासाठी जातीअंताचा लढा उभारणे काळाची गरज बनली आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारने योग्य भूमिका घेतली नसल्याची टीका करीत जातीअंताची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातून करण्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली. कम्युनिस्ट पक्षाच्या स्मिता पानसरे, जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष बाबा अरगडे, लोक अधिकार आंदोलनचे अध्यक्ष डॉ. अरुण जाधव यांची भाषणे झाली.
पुरोगामी विचारधारेने एकत्र येण्याची गरज
By admin | Updated: May 30, 2016 03:59 IST