मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देशभरात केवळ 1.6 टक्के मते मिळून अवघे सहा खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे या पक्षाची राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता का रद्द करण्यात येऊ नये, अशी नोटीस निवडणूक आयोगाने बजावली असली तरी खासदार आणि आमदारांची संख्या लक्षात घेता आमची मान्यता जाणार नाही, असा दावा पक्षाचे प्रवक्ते आ. नवाब मलिक यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाच्या निकषानुसार लोकसभा निवडणुकीत किमान 6 टक्के मते किंवा 11 खासदार निवडून आले तरच तो पक्ष राष्ट्रीय पक्ष होऊ शकतो. मात्र राष्ट्रवादीला केवळ 1.6 टक्के मते मिळून सहा खासदार निवडून आले. त्यामुळे या पक्षाची ‘राष्ट्रीय’ मान्यता धोक्यात, अशा आशयाचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने तशी नोटीसही राष्ट्रवादीसह बहुजन समाज पक्ष व भाकप या पक्षांना बजावली होती.
याबाबत नवाब मलिक म्हणाले, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे महाराष्ट्र, बिहार आणि लक्षद्वीप अशा तीन राज्यांत सहा खासदार निवडून आले; तर महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मेघालय, मणिपूर, नागालँड राज्यात आमदार निवडून आलेले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाने बजावलेल्या नोटिशीला कायदेशीर उत्तर दिलेले आहे, असेही नवाब म्हणाले. (प्रतिनिधी)