पुणे : कंपनीतील नोकरी, टेम्पोचालक ते नाटक, मराठी-हिंंदी चित्रपटांतील दिग्गज नायक... पडद्यावर खलनायक रंगवणारा परंतु प्रत्यक्ष आयुष्यात नायकच... एकदा धडक द्यायची म्हणून ठरवलं की एक तर भीत तुटणार किंंवा डोकं फुटणार हेच गमक आयुष्यभर पाळत आलेला बिनधास्त परंतु आपल्या तत्त्वांशी प्रामाणिक असणाऱ्या सच्चा कलाकाराचा ‘नटखट’ प्रवास रविवारी उलघडला. निमित्त होते प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांच्या ‘नटखट’ या आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशनाचे. कुटुंबीय, समकालीन कलाकार, दिग्दर्शक, मित्रवर्य यांच्या आठवणीतून, अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत, दृकश्राव्य माध्यमातून ज्येष्ठांनी व्यक्त केलेल्या भावनांमधून जोशी यांचा प्रवास उलगडत गेला.पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते आणि राज्याचे अन्नपुरवठामंत्री गिरीश बापट, ज्येष्ठ रंगकर्मी विद्याधर वाटवे, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, अशोक कोठावळे, जोशी यांच्या पत्नी तसेच मुलगी गौरी जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या वेळी बोलताना बापट म्हणाले, मी आणि मोहन आते-मामे भावंडं आहोत. नाते सांगून ओळख सांगण्यापेक्षा कर्तृत्वाने ओळख सांगणे जास्त महत्त्वाचे असते त्यामुळे आजवर दोघांनीही कधी नात्याची ओळख सांगितली नाही. कष्ट केले तर आयुष्यात खूप मोठा पल्ला गाठता येतो हे मोहन यांनी सिद्ध करुन दाखवले आहे. डॉ. जब्बार पटेल म्हणाले, की भूमिका करणे अवघड काम असते. भूमिका करताना आजूबाजूचा प्रसंग टिपत जाऊन तो अभिनयात रुजवून सादरीकरण करणे त्याहून अवघड असते. त्यामुळे एखादा कलावंत जेव्हा लिहितो तेव्हा तो इतिहास होतो. (प्रतिनिधी)घाशीराम व मोहन जोशी हेच समीकरण झाले असते -‘घाशीराम’ नाटकाचे प्रयोग झाल्यानंतर प्रचंड गदारोळ माजला आणि घाशीराम व नाना फडणवीसांची भूमिका केलेले अनुक्रमे रमेश टिळेकर व मोहन आगाशे यांना त्यानंतर त्याच भूमिकांवरुन लोक ओळखायला लागले. त्यांना आगामी काळात वेगळी भूमिकाच मिळेनाशी झाली. त्यामुळे जोशी यांनी घाशीराम साकारला असता तर जोशी व घाशीराम हेच समीकरण होऊन त्यांना पुढे त्रास झाला असता. त्यामुळे जोशींना भूमिका मिळाली नाही हे चांगलेच झाले. असे डॉ.पटेल यांनी सांगितली.