सचिन धर्मापुरीकर/प्रमोद आहेर, शिर्डीनाशिक, निफाड परिसरातील कारखान्यांतून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या मल-मूत्र, रसायनमिश्रित पाण्यामुळे गोदावरी प्रदूषित झाली असून नदीच्या डाव्या, उजव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या सिन्नर, राहाता, कोपरगाव व येवला तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गोदावरील नदीवरील ८५ पाणी योजनांच्या माध्यमातून सात लाख लोकांना पाणी पुरवठा केला जातो. धक्कादायक म्हणजे ग्रामीण भागातील जवळपास नव्वद टक्के योजनांना जलशुद्धीकरण प्रकल्प नाहीत़ थातूरमातूर प्रक्रिया करून हे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येते. ८५ योजनांवर सात लाख नागरिक व कालव्यांवर २९ हजार ५६० शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे़ कालव्यातून अनेकदा काळे पाणी येते, त्याला दुर्गंधी असते. मात्र नाईलाजास्तव हे पाणी लोकांना प्यावे लागते.नाशिक व त्र्यंबकेश्वर यथील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात सहा कोटी भाविक गोदास्नान करतील, असा अंदाज आहे. उच्चतम पातळीवर पोहोचलेले जल प्रदूषण भाविकांच्या आरोग्यावर संक्रांत आणणारे ठरू शकते.
नाशिक, नगर जिल्ह्यातील लोकांचे आरोग्य धोक्यात!
By admin | Updated: March 30, 2015 02:05 IST