ऑनलाइन लोकमत -
नागपूर, दि. 17 - पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेत प्रश्नपत्रिकेतील घोळ संशयास्पद ठरला. परिणामी परिक्षार्थ्यांनी ‘सेटींग‘चा आरोप करून जोरदार हरकत घेतली. त्यामुळे पोलीस मुख्यालयात प्रचंड गोंधळ उडाला. नारेबाजी, रस्तारोकोमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलीस आयुक्तांनी संतप्त परिक्षार्थ्यांना आपल्या कक्षात बोलवून त्यांची समजूत काढल्यानंतर तब्बल ४ तासांनी तणाव निवळला.
पोलीस भरतीच्या मैदानी आणि इतर प्रक्रियेत यश मिळवलेल्या ३ हजार पात्र परिक्षार्थ्यांना आज सकाळी लेखी परिक्षेसाठी पोलीस मुख्यालयात बोलवण्यात आले होते. त्यानुसार, राज्याच्या कानाकोप-यातून पात्र परिक्षार्थी लेखी परिक्षेला हजर झाले. सकाळी ७ नंतर लेखी परिक्षा सुरू झाली. ए, बी. सी, डी अशा चार स्वरूपात प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली होती. उत्तरासाठी चार पर्याय दिले होते. दहा वाजता दरम्यान पेपर संपवून हळूहळू विद्यार्थी मुख्यालयाच्या मैदानात जमू लागले. सकाळी १० च्या सुमारास एकमेकांशी चर्चा करताना कोणते उत्तर बरोबर आणि कोणते चूक त्याबाबत शहानिशा करू लागले. प्रश्नपत्रिकेच्या बी संचात उत्तराची जी चार पर्याय दिली होती. त्यातील एक पर्याय काहीसा फिक्कट (पुसटसा) असल्याचे परिक्षार्थ्यांच्या लक्षात आले. पुसट असलेले सर्वच पर्याय योग्य उत्तर होते. त्यामुळे पोलीस अधिका-यांनी जाणीवपूर्वकच हा प्रकार केल्याचा विद्यार्थ्यांना संशय आला. यामुळे सेटींगची कुजबूज वाढली अन् गोंधळाला सुरूवात झाली.
हजारेक परिक्षार्थी एकत्र झाले आणि त्यांनी परिक्षा केंद्रावरील पोलीस अधिका-यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून देत परिक्षा रद्द करण्याची मागणी लावून धरली. परिक्षा प्रमूख श्रीकांत तरवडे यांना ही बाब कळताच त्यांनी परिक्षार्थ्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिक्षार्थी ऐकायला तयार नव्हते. त्यांनी नारेबाजी सुरू केली.पोलीस मुख्यालयाजवळच्या रस्त्यावर ठाण मांडून रस्ता रोको केला. यामुळे प्रचंड तणाव वाढला. वातावरण चिघळण्याचे संकेत मिळाल्याने पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी परिक्षार्थ्यांना आपल्या कार्यालयात बोलवून घेतले.
प्रश्नपत्रिकेच्या बी संचाची उत्तरे सोडविणा-या विद्यार्थ्यांपैकी किमान १० ते १५ जणांना ९० टक्के पेक्षा जास्त गूण मिळाल्याचे आढळल्यास ही लेखी परिक्षा रद्द केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.
तिस-यांदा घोळ
शहर पोलिसांच्या भरती प्रक्रियेतील घोळाची ही तिसरी वेळ आहे. पहिल्यांदा ही परिक्षा २२ एप्रिलला होणार होती. त्यावेळी उपस्थित झालेल्या अडचणीने परिक्षा पुढे ढकलण्यात आली. नंतर १० मे रोजी शासनाने जास्त पदासाठी भरती घेण्याचे आदेश दिल्याने लेखी परिक्षा पुढे ढकलण्यात आली. तर, तिस-यांदा आज प्रश्नपत्रिकेतील उत्तराचा पर्याय पुसट असल्याने संशयकल्लोळ वाढला. दरम्यान, आज रात्रीपर्यंत यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी पत्रकारांना सांगितले.