ठाणे : एकनाथ शिंदे अनेक वर्षे आमदार आहेत. राज्यात बांधकाममंत्री म्हणून ते चांगले काम करत आहेत. कार्यतत्पर मंत्री असा त्यांचा लौकीक आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर दगड पडला की, रस्त्यावर येण्याआधीच ते तेथे पोहोचलेले असतात, असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेले कौतुक; तर धनंजय मुंडे हे एक अभ्यासू, दूरदृष्टी असलेले परिपक्व नेते म्हणून कार्यरत आहेत. जिथे आक्रमक व्हायचे, तिथे ते आक्र मक होतात आणि जिथे संयमी व्हायचे तेथे ते संयमी होतात, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी केलेले कौतुक असा परस्परांवरील स्तुतिसुमनांचा कार्यक्रमरविवारी ठाणेकरांनी अनुभवला. निमित्त होते मराठवाडा जनविकास परिषदेतर्फे आयोजित मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन सोहळा आणि गुणगौरव समारंभाचे. मुंडे म्हणाले, ‘‘ठाण्यात भाषण करण्याची माझी ही पहिली वेळ आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सभागृहात अनेक भाषणे केली. पण, ठाण्यात येऊन त्यांच्यासमोर भाषण करण्याची पहिलीच वेळ आहे. मधल्या काळात ‘वाघ-सिंह’ असा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला. त्यामुळे साहजिकच माझ्यासारख्या तरुणापुढे आदरयुक्त भीती निर्माण झाली आहे. ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्र होण्याची परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा विदर्भाने वेगवेगळ्या अटी घातल्या. मराठवाडा मात्र विनाअट संयुक्त महाराष्ट्रात सामील झाला. मधल्या काळात विदर्भ वेगळा झाला पाहिजे, असे साप सोडले गेले. काहींनी महाराष्ट्राचे चार तुकडे करण्याची भूमिका मांडली होती. विदर्भ वेगळा झाला, तर स्वावलंबी होईल; पण मराठवाडा वेगळा करण्याचा विचार झाला, तर त्या मराठवाड्यात आहे काय? मराठवाड्याचा विचार आता आपापल्या व्यासपीठावर मांडण्याची गरज आहे.’’ ‘‘मराठवाड्यातील लोकांना वेळेचे भान नसते, तसे कामाचेही भान नसते. बेभानपणे तेथील माणूस काम करतो. मराठवाडा ज्यावेळी दुष्काळात होरपळत होता, तेव्हा तेथील माणूस विस्थापित होऊन ठाण्यात आला. रोजगारासाठी वणवण फिरत असताना माणुसकी दाखवत त्यांना सांभाळण्याचे काम शिंदेंनी केले,’’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. शिंदे म्हणाले, ‘‘आजघडीला राज्यात प्रशासकीय सेवेत विविध महत्त्वाच्या पदांवर मराठवाड्यातील तब्बल ४० अधिकारी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्याचे काम ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर करत आहेत. राज्यात जरी सरकार बदलले किंवा मंत्री बदलले असतील तरी काम कोण करते, हे आपल्याला माहीत आहे, असा उल्लेख करत शिंदे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा उल्लेख केला. मराठवाड्यातील बहुतांश मंडळी ठाण्यात आहेत. मी विरोधी पक्षनेता असताना मराठवाड्यात फिरलो. त्यावेळी विदारक चित्र पाहायला मिळाले. मंत्री झाल्यानंतर पुन्हा तेथे गेलो. तेथील परिस्थिती पाहिल्यावर चांगले-वाईट अनुभव आल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी एकनाथ शिंदे यांना ‘मराठवाडामित्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लातूर एक्स्प्रेसला ठाणे रेल्वे स्टेशनवर थांबा मिळवून दिल्याबद्दल खासदार राजन विचारे यांना विशेष सन्मानित करण्यात आले. लातूर एक्स्प्रेसला आई तुळजाभवानीचे नाव देण्यात यावे, तसेच आणखी एका गाडीला ठाण्यात थांबा मिळावा, अशा मागण्या परिषदेने विचारे यांच्याकडे केल्या. या मागण्यांसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी, विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्तींचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. छत्रपती राजर्षी शाहू सहकारी बँकेचे अध्यक्ष अर्जुनराव पाटील, समस्त महाजन संस्था, इंडियन मेडिकल असोसिएशनचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मराठवाडा जनविकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, उपाध्यक्ष डॉ. अशोक नांदापूरकर, महासचिव सोपान बोंगाणे आणि पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) >‘मराठा मोर्चाचा विषय एका समाजापुरता नाही’मराठा आरक्षण आणि मराठा मोर्चासंदर्भात मुंडे म्हणाले, सर्व पक्षांतले, सर्व स्तरांतले, त्या समाजांचे आणि बहुजन समाजांचेही अनेक लोक तेथे येत आहे. कोपर्डीच्या बलात्कार प्रकरणानंतर सर्वच स्तरांवर मराठवाड्यात आणि इतर महाराष्ट्रातही जे मोर्चे निघत आहेत, ते पाहता हा एका समाजापुरता विषय नाही. त्यातच आरक्षणाच्या मागणीचा विषय पुढे येतो आहे. आताच्या सरकारने कोर्टात मराठा आरक्षणाची बाजू नीट न मांडल्याचा असंतोषही या मोर्चाच्या माध्यमातून त्यांच्या मागण्यांच्या बाबतीत होत आहे. हा मोर्चा कोणाविरोधात नाही. मोर्चात कोणतीही घोषणा दिली जात नाही. रास्त मागण्यांसाठी लोक रस्त्यावर येत असल्याने सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा. हा असंतोष केवळ मराठा समाजाचा नाही. इतर समाजही या माध्यमातून पुढे येत आहेत.
मुंडे-शिंदे स्तुतिसुमनांनी रंगला मुक्तिसंग्राम सोहळा
By admin | Updated: September 20, 2016 03:52 IST