ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या इंजीनिअरिंगच्या उत्तरपत्रिकांच्या घोटाळा मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला असून याप्रकरणी विद्यापीठातील ४ क्लार्क, ३ शिपाई व १ कस्टोडिअन यांना अटक करण्यात आली आहे. हे रॅकेट उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली आहे. या आरोपींकडून आत्तापर्यंत एकूण ९२ उत्तरपत्रिका हस्तगत करण्यात आल्या आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठामध्ये काही विध्यार्थी उत्तर पत्रिका बाहेर आणून सोडवत असल्याची माहिती समोर आली होती. त्याप्रकरणाचा अधिक तपास करण्यात आला असता विद्यापाठातील कर्मचा-यांची टोळी इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन हे रॅकेट चालवत होती, असे समोर आले.
परीक्षेदरम्यान या विद्यार्थ्यांकडून पैसे आणि हॉलतिकीट घेतले जात असे. त्यानंतर पेपर लिहीताना विद्यार्थी फक्त हजेरी लावून उत्तरपत्रिका कोरी सोडून येत असत. पेपर संपल्यानंतर रात्री या विद्यार्थ्यांना विद्यापीठात बोलावले जात असे आणि त्यांना त्यांच्या उत्तरपत्रिका दिल्या जात असत. विद्यार्थी या उत्तरपत्रिकांवर घरी जाऊन उत्तरे लिहत आणि दुसऱ्या दिवशी याच उत्तरपत्रिका परत विद्यापीठात आणून देत. यानंतर उत्तरपत्रिका परीक्षकांकडे तपासणीसाठी पाठविल्या जात असत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.