संदीप आडनाईक -कोल्हापूरदेशातील पहिला स्वदेशी बनावटीचा कॅमेरा तयार करून लोकमान्य टिळक यांच्याकडून सिनेमा केसरी अशी पदवी मिळविलेल्या कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्यावरील मराठी चित्रपटाची निर्मिती पुण्याचे दिग्दर्शक उज्ज्वल गावंड करत आहेत. सुखांत पाणीग्रही हे या चित्रपटाचे कलादिग्दर्शक आहेत. या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झाले नसले तरी हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट होणार आहे. या चित्रपटासाठी साडेतीन कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे.कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी कलात्मक चित्रपटांचे युग देशभरात आणले. शिल्पकार, चित्रकार या त्यांच्या ओळखीपेक्षा ‘सैरंध्री’ या चित्रपटाद्वारे पहिल्या महिला स्त्री कलाकार रुपेरी पडद्यावर आणणारे आणि स्वदेशी बनावटीच्या कॅमेऱ्याने चित्रपटाचे चित्रीकरण करणारे पहिले व शेवटचे दिग्दर्शक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. याशिवाय अनेक तंत्राचे पहिले जनक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. आशिया खंडात त्यांची तुलना ग्रीफिथ यांच्यासोबत केली जाते. महाराष्ट्र फिल्म कंपनी स्थापन करून १९१८ मध्ये बाबूराव पेंटर यांनी ‘सीता स्वयंवर’ हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला असला तरी १९१९ मध्ये ‘सैरंध्री’ या चित्रपटाच्या निर्मितीतून त्यांनी कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. ७ फेब्रुवारी १९२0 रोजी पुण्याच्या आर्यन सिनेमागृहात हा मूकपट प्रदर्शित झाला. याच चित्रपटामुळे सेन्सॉर बोर्ड अस्तित्वात आले. १९२0 ते १९३0 या काळात त्यांनी १७ चित्रपटांची निर्मिती केली.मूळचे रायगड जिल्ह्यातील उरणचे रहिवासी असलेले उज्ज्वल गावंड या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. उज्ज्वल यांनी पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमधून चित्रपटविषयक अभ्यासक्रम पूर्ण केला असून दोन वर्षांपासून या चित्रपटावर ते काम करीत आहेत. त्यांच्यासोबत कलादिग्दर्शक सुखांत पाणीग्रही हेही या भव्य चित्रपटासाठी मेहनत घेत आहेत. सुखांत पाणीग्रही यांनी ‘गंगाजल’ चित्रपटापासून कला दिग्दर्शनाला सुरुवात केली. ‘चक दे इंडिया’, ‘कहाणी’, ‘बॉम्बे वेल्वेट’ या चित्रपटांचे कला दिग्दर्शनही त्यांनीच केले.बाबूराव पेंटर व आनंदराव पेंटर यांच्यातील नातेसंबंध, चित्रपट निर्मितीचा दोघांचा ध्यास, आनंदराव पेंटर यांच्या मृत्यूनंतर बाबूराव यांची मन:स्थिती आणि सैरंध्री चित्रपटाच्या निर्मितीपासून महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या चित्रपट निर्मितीच्या कालखंडावर हा चित्रपट बेतलेला आहे. या महत्त्वाकांक्षी चित्रपटासाठी उज्ज्वल गावंड यांनी कोल्हापुरात अनेकवेळा भेट दिली आहे. कोल्हापूरचा परिसर विशेषत: रंकाळ्यावरील लोकेशनचा या चित्रपटात भर असणार आहे. याशिवाय १९१९ मधील मराठीची भाषाशैली कशी होती, यावर ते विशेष अभ्यास करत आहेत. त्या काळातील साहित्याचाही ते शोध घेत आहेत. ‘सैरंध्री’च्या वेळी बाबूराव पेंटर यांनी जसा स्टुडिओ उभारला होता, तसाच स्टुडिओ उभारण्याचा कला दिग्दर्शक सुखांत पाणीग्रही प्रयत्न करत आहेत. मद्रास फिल्म इंडस्ट्रीजची पायाभरणी करणाऱ्या बाबूराव पेंटर यांच्या या चित्रपटासाठी दक्षिणेबरोबरच देशभरातील अनेक नामवंत कलावंत काम करत आहेत. हा चित्रपट मराठी भाषेत होणार असला तरी इंग्रजी आणि हिंदी भाषेतील उपशीर्षके चित्रपटाला असणार आहेत. दादासाहेब फाळके यांनी पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली, पण बाबूराव पेंटर यांचे चित्रपट देशात आणि देशाबाहेर प्रदर्शित झाले. त्यांच्या चित्रपट निर्मितीचा ध्यास हा चित्रपटाचा विषय ठरू शकतो म्हणून या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटातील कलाकार अद्याप निश्चित झालेले नसले तरी पटकथेवर काम सुरू आहे. लवकरच प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे.- उज्ज्वल गावंड, दिग्दर्शक
बाबूराव पेंटर यांच्यावर लवकरच चित्रपट
By admin | Updated: June 3, 2015 00:59 IST