मुंबई : ‘मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षणाचे आश्वासन दिलेल्या युती सरकारने मागणी पूर्ण केली नाही, तर मंत्र्यांना त्यांच्या राहत्या बंगल्यात कोंडू,’ असा इशारा अखिल भारतीय मातंग संघाने दिला आहे. सरकारला इशारा देण्यासाठी १८ डिसेंबरला संघटनेच्या वतीने नागपूर येथे धडक मोर्चाही काढणार असल्याचे संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आघाडी सरकारच्या कार्यकाळात विरोधी बाकावर असताना युतीचे सरकार आल्यावर मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले होते, असा दावा गोपले यांनी केला आहे. त्यामुळे आता सत्ता आल्यावर आश्वासन पूर्ण करावे. अन्यथा रस्ते आणि लाल दिव्यांच्या गाड्या दिसेल तिथे अडवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शिवाय आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास मंत्र्यांना बंगल्याबाहेर पडू देणार नाही, त्यांना त्यांच्या निवासस्थानीच रोखून ठेवू, असा इशारा गोपले यांनी दिला आहे.दरम्यान, मराठा आरक्षण समितीच्या पार्श्वभूमीवर मातंग समाजाच्या आरक्षणासाठीही समिती स्थापन करण्याची संघटनेची प्रमुख मागणी आहे. राज्यात १ कोटी २० लाख मातंग असून, समाजात विविध ३२ जाती आहेत. त्यामुळे अनुसूचित जमातीमधील आरक्षणाचा म्हणावा तितका फायदा होत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
‘...तर मंत्र्यांना बंगल्यात कोंडू!’
By admin | Updated: December 17, 2014 03:23 IST